चोसाका संचालकांविरुद्ध पोलिसात फिर्याद 

चोसाका संचालकांविरुद्ध पोलिसात फिर्याद 

चोपडा : चोसाका मंडळाने शेतकऱ्यांना पेमेंटचे दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला आहे. संचालक मंडळ संवेदनशील नसल्याने त्यांच्या विरोधात आज शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असल्याची माहिती कृती समितीचे प्रमुख एस. बी. पाटील यांनी दिली. 

चोसाका मंडळाने 2017-2018च्या गळीत हंगामात उसाचे पेमेंट काट्याखाली पैसे देऊ असे आश्‍वासन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस दिला. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना उसाची थकीत रक्कम मिळत नसल्याने संचालक मंडळाने शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरोधात आज सकाळी अकराला शहर पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्याकडे रीतसर लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. 

यांच्या विरोधात तक्रार 
अध्यक्ष अतुल ठाकरे, उपाध्यक्ष शशिकांत देवरे, संचालक अनिल पाटील, सुरेश पाटील, प्रवीण गुजराथी, भरत पाटील, सुनील महाजन, आनंदराव रायसिंग, आत्माराम म्हाळके, सुरेश पाटील, नीलेश पाटील, जितेंद्र पाटील, सुरेखाबाई पाटील, प्रदीप पाटील, नीता पाटील, गोपाळ धनगर, कार्यकारी संचालक पिंजारी अकबर शफी, चीफ अकाउंटंट अशोक पाटील यांचा समावेश आहे. 

तहसीलदारांच्या दालनात बैठक 
तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, कृती समितीचे प्रमुख एस. बी. पाटील व शेतकऱ्यांची उसपेमेंट व चोसाका संचालक मंडळाने दिलेले धनादेश यावर चर्चा झाली. यात उसाच्या थकीत रकमेचे बंधन बॅंकेचे धनादेश शेतकऱ्यांना कारखान्याकडून देण्यात आले होते. मात्र, मुदत पूर्ण होऊनही धनादेश वटले नाहीत. तेव्हा संचालक मंडळाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला. कारखान्याकडून एकही संचालक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास हजर नव्हता. तहसीलदार गिरासे यांनी चोसाकाशी फोनवर संपर्क साधला मात्र ठोस काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

शेतकऱ्यांची व्यथा 
संचालकाविषयी द्वेष नाही. मात्र, पैशांचे सोंग करू शकत नाही. तेव्हा नाइलाजाने तक्रार दाखल करावी लागत आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी दिलीप पाटील, विजय पाटील, प्रदीप पाटील, विजय पाटील, दिलीपसिंग सिसोदिया, भरत पाटील, दिलीप धनगर, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील, मुकुंद पाटील, चंद्रकांत पाटील या शेतकऱ्यांनी पोलिस निरीक्षक नजनपाटील यांना तक्रार दिली. 
 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीसंबंधी सरकारी वकिलांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. 
-किसनराव नजनपाटील, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे, चोपडा. 
 
शेतकऱ्यांनी कारखान्याकडील थकीत रक्कम मिळावी यासाठी अनेक माध्यमातून प्रयत्न केले. मात्र, असंवेदनशील राजकारण्यांना शेतकऱ्यांची दया आली नाही. संचालकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे नाइलाजाने तक्रार दाखल करावी लागली. 
- एस. बी. पाटील, शेतकरी कृती समिती, चोपडा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com