Loksabha 2019 : रावेरची जागा आणि यशही कॉंग्रेसलाच मिळेल : ऍड. संदीप पाटील

sandip patil
sandip patil

जळगाव : लोकसभेचा रावेर मतदारसंघ मिळण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. आमचे वरिष्ठ नेतेही त्यासाठी चर्चा करीत आहेत. तो आम्हाला मिळेलच, याची शंभर टक्के खात्री असून, निश्‍चित आमचा उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी व्यक्त केला. "सकाळ संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'च्या गोलाणी संकुलातील शहर कार्यालयात ऍड. पाटील यांच्याशी पक्षाची तयारी, सरकारची तयारी आदी विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा केली असता त्यांनी दिलखुलासपणे आपली भूमिका मांडली. 

प्रश्‍न : जळगाव जिल्ह्यात लोकसभा उमेदवारीत कॉंग्रेस मागे पडली आहे काय? 
उत्तर : नाही, मुळीच नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला, त्यांचा उमेदवारही जाहीर झाला आहे. मात्र, रावेर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसला मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तो आम्हाला शंभर मिळेलच, त्यात आमचाच उमेदवार विजयी होईल, याचीही आम्हाला खात्री आहे. 

प्रश्‍न : भाजपची थेट बूथ लेव्हलपर्यंत तयारी आहे, आपण लढणार कसे? 
उत्तर : आमच्याकडे हा मतदार संघ नसला तरी आम्ही गेल्या दीड वर्षांपासून तयारी करीत आहोत. आम्ही लोकसभा मतदार संघात संपूर्ण बूथ रचना तयार केली आहे. जिल्हा प्रभारी वामशी चेला रेड्‌डी हे प्रत्येक बूथनिहाय आढावा घेत आहेत. 

प्रश्‍न : भाजपला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे काय मुद्दे आहेत? 
उत्तर : आमच्याकडे देशापासून तर थेट रावेर लोकसभा मतदार संघापर्यंत सर्व मुद्दे आहे. गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाने लोकांची निराशाच केली आहे. पक्षाच्या खासदारांनीही विकासासाठी ठोस असे काम केलेले नाही. केळीला नुकसान भरपाईसुद्धा ते देऊ शकलेले नाहीत. शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली आहे, शेळगाव बॅरेजसह सिंचनाचे कोणतेच प्रश्‍न सुटलेले नाहीत. 

प्रश्‍न : कॉंग्रेसमध्ये गटतट असून, कार्यकर्त्यांची वानवा आहे? 
उत्तर : कॉंग्रेसमध्ये आता कोणतेही गटतट राहिलेले नाही. कॉंग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची चणचण नाही. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून, कार्यकर्ते मोठ्या संख्येने कामाला लागले आहेत. 

प्रश्‍न : कॉंग्रेसने जिल्ह्यात जोरदार विरोध केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
उत्तर : आम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार संघर्षयात्रा काढली, मोर्चे काढले. त्या माध्यमातून सरकारविरोधात आम्ही जनतेत जागृती केली. त्यामुळे कॉंग्रेसने विरोध केला नाही, म्हणणे चुकीचे आहे. 

प्रश्‍न : सत्तेच्या काळात जिल्ह्यात पक्षवाढीकडे लक्ष दिले नाही? 
उत्तर : होय, ही बाब खरी आहे. सत्तेच्या काळात आम्ही कोणालाही संधी दिलेली नाही. मात्र, त्यातून आम्ही धडा घेऊन आता जिल्ह्यात पक्षबांधणीकडे लक्ष देत आहोत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वत: जिल्ह्याकडे लक्ष देत आहेत. 

प्रश्‍न : रावेरमध्ये तुमची तयारी आहे काय? 
उत्तर : जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत एक जागा कॉंग्रेसला मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या ठिकाणी डॉ. उल्हास पाटील हे आमचे उमेदवार आहेत. ही जागा आमच्याकडे आली तर नक्की जिंकू. याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत असलेल्या दुफळीचा फायदा आम्हाला होईल, याची खात्री आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मतदारसंघात विकासकामे करण्यास अपयशी ठरले आहेत. या मतदार संघात एकही मोठा उद्योग आलेला नाही. दाखविण्यासारखे कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार निश्‍चित विजयी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com