जिल्ह्याचे सत्ताकेंद्र आता होतेय "धरणगाव' 

Gulabrao-Patil
Gulabrao-Patil

राज्यातील सत्ता बदलामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरणही बदलले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांना बढती मिळून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. शिवाय, त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे सत्ताकेंद्र धरणगाव झाले असून, त्या ठिकाणाहून आता हलणारी सूत्रे जिल्ह्याच्या राजकारणात काय बदल घडविणार, हे आगामी काळात दिसून येईल. 

राज्यातील बदलत्या राजकारणाचा जिल्ह्याच्या राजकारणावर नेहमीच बदल झाला आहे. जिल्ह्यात लोकसभा मतदार संघनिहाय राजकारण होत असले तरी जिल्ह्याचे राजकारण तापीकाठ आणि गिरणाकाठ या दोन्ही भागात विभागला जाते. तापीकाठच्या परिसरात आजचा रावेर लोकसभा मतदारसंघ येतो तर गिरणाकाठच्या मतदारसंघात जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे.

राजकीय पटलाचा विचार केल्यास कॉंग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिमंडळात चाळीसगाव, पाचोरा, मतदारसंघाचा दबदबा होता. त्यावेळी गिरणाकाठ हे सत्ता केंद्र मानले जात होते. त्यावेळी डी. डी. चव्हाण, के. एम. बापू पाटील हे मंत्री होते. त्यानंतरही कॉंग्रेसच्या काळात सत्ताकेंद्र रावेर, यावल आणि फैजपूर या तापीकाठच्या भागाकडे वळले. मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील आणि जे. टी. महाजन हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. तर चोपड्याच्या शरश्‍चंद्रिकाताई पाटील व अरुणभाई गुजराथी कॉंग्रेस आघाडीच्या काळात मंत्री होत्या. पुढे युतीचे शासन आल्यावर एकनाथराव खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने सत्ता केंद्र पुन्हा तापीकाठाकडे होते. तर याच काळात सुरेशदादा जैन यांचाही युतीच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जळगाव शहराकडे पहिल्यांदाच सत्ता केंद्र आले होते. मात्र, कालांतराने कॉंग्रेस आघाडीच्या सत्ता काळात सुरेशदादा जैन यांना पुन्हा संधी मिळाली होती. तसेच डॉ. सतीश पाटील आणि पुढच्या काळात गुलाबराव देवकर यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने सत्ता केंद्र पुन्हा गिरणाकाठाकडेच आले होते. 
सन 2014 च्या झालेल्या निवडणुकीत राज्यात युतीचे सरकार आले. पहिल्या टप्प्यात एकनाथराव खडसे यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांनाच पालकमंत्री मिळाले. त्यामुळे तापीकाठचे जिल्ह्यातील सत्ताकेंद्रांत वर्चस्व आले. गैरव्यवहाराच्या आरोपावरून खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर गिरीश महाजन यांच्या जामनेरकडे सत्तेचे वर्चस्व आले. त्याच वेळी गुलाबराव पाटील मंत्रिमंडळात होते. मात्र, त्यांना परभणीचे पालकमंत्रीपद मिळाले. त्यामुळे त्यांचे जिल्ह्याच्या सत्ता केंद्रात वर्चस्व कमी होते. 
राज्यात महाआघाडीच्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता हे कॅबिनेट मंत्रिपदाचे खाते मिळाले आहे. त्यातच त्यांना पालकमंत्रीपदही मिळाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात सत्ताकेंद्र गिरणाकाठाकडे आले आहे. जळगाव ग्रामीण अर्थात धरणगाव तालुका जिल्ह्याचे सत्ताकेंद्र असणार आहे. गुलाबराव देवकर यांच्यानंतर पालकमंत्रीपद पुन्हा एकदा जळगाव ग्रामीणकडे आले आहे. 


शिवसैनिक ते मंत्री 
गुलाबराव पाटील यांनी साध्या शिवसैनिकापासून आपल्या राजकीय जीवनास सुरवात केली आहे. शिवसेना उपनेता, राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री, आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे आले आहे. जिल्ह्याचे प्रश्‍न सोडविण्यासह विकासाची संधी त्यांना मिळाली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्‍नासाठी आंदोलन करणारे गुलाबराव पाटील हेच प्रश्‍न सोडविण्यासाठी आपल्या हाती पूर्ण जिल्ह्याची असलेली सूत्रे राबविण्याचे कौशल्य कसे दाखविणार याकडेच आता जनतेचे लक्ष असणार आहे. त्यावरच आगामी काळात "जळगाव ग्रामीण'मध्ये महत्त्वाचे असलेले धरणगाव जिल्ह्याचे सत्ताकेंद्राचे सूत्रधार असेल एवढे मात्र निश्‍चित. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com