तीन वर्षांत जिल्हा परिषदेचा 32 कोटींचा निधी अखर्चिक 

तीन वर्षांत जिल्हा परिषदेचा 32 कोटींचा निधी अखर्चिक 

जळगाव : जिल्ह्यामध्ये विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातर्फे सर्व विभागांना निधी वितरित केला जातो. जिल्हा परिषदेला नियोजन मंडळातून सुमारे 370 कोटी रुपयांचा निधी दिली होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा निधी खर्च न झाल्यामुळे यातील सुमारे 32 कोटी रुपयांचा निधी अखर्चिक असल्याचा प्रकार समोर आला आहे. नियोजन मंडळाची बैठक 19 जुलैला होणार असल्याने अखर्चिक निधीचा मुद्दा गाजणार आहे. 

जिल्हा नियोजन मंडळाची विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेवटची बैठक 19 जुलैला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीचे नियोजन करण्यासाठी सर्व विभागांचा आढावा आज घेण्यात आला. यामध्ये जिल्हा नियोजन मंडळामार्फत विविध विभागांना निधी वितरित केला जातो. हा निधी मुदतीच्या आत खर्च करणे आवश्‍यक असते. मात्र असे असतानाही जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चिक राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कामचुकारपणामुळे विकासकामांना ब्रेक 
जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतील अखर्चिक निधीवरुन अनेकवेळा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये अधिकारी व पदाधिकारी यांच्यात वाद होऊन शाब्दिक चकमकी उडाल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे जिल्ह्याच्या विकासकामांसाठी मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा निधी तीन वर्षांपासून अखर्चिक राहत असल्यामुळे विकासकांना ब्रेक लागत आहे. 

पालकमंत्र्यांचा खात्यातील 15 कोटी परत 
जिल्हा नियोजनकडून मिळालेल्या निधीतून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी दिलेला 3 कोटी रुपयांचा निधी देखिल परत गेला आहे. तसेच मृद्‌संधारण विभागाचे 3 कोटी 50 लाख, कौशल्य विकास विभागाचे 3 कोटी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग 2 कोटी 50 लाख, जिल्हा ग्रंथालय अधिकारी 2 कोटी, पशुसंवर्धन उपायुक्त 1 कोटी 25 लाख असा एकूण 15 कोटी रुपयांचा निधी परत गेला असल्याचे समोर आले आहे. 

अखर्चिक निधीवरुन गाजणार सभा 
विकासकांसाठी नियोजन मंडळाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र मृद संधारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कौशल्य विकास विभाग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा ग्रंथालय याविभागांचा निधी परत गेला असून जिल्हा परिषदेचा कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चिक राहिला आहे. त्यामुळे या मुद्यांवर नियोजन मंडळाची सभा गाजणार असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेचा अखर्चिक निधी (सर्वसाधारण योजना) 
वर्ष मिळालेला निधी अखर्चिक निधी 
2015- 16 127 कोटी 14 कोटी 
2016- 17 123 कोटी 5 कोटी 
2017- 18 120 कोटी 10 कोटी 

आदिवासी उपयोजना 
वर्ष वितरित निधी अखर्चिक निधी 
2015- 16 19 कोटी 1 कोटी 40 लाख 
2016- 17 23 कोटी 60 लाख 2 कोटी 12 लाख 
2017- 18 15 कोटी 30लाख 1 कोटी 20 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com