कार्यकाळ पूर्ण होत असताना पुन्हा एकदा वाद 

कार्यकाळ पूर्ण होत असताना पुन्हा एकदा वाद 

जळगाव : जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षांपासून अधिकारातून अध्यक्षांनी सादर केलेल्या याद्यांचा मुद्दा वारंवार गाजत आहे. तोच वाद कार्यकाळ पूर्ण होत असताना पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित असलेल्या नवीन अंगणवाडी बांधकामाच्या याद्यांवरून हा वाद निर्माण झाला आहे. अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडून वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्याने यात प्रशासन मात्र भरडले जात आहे. 
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील 4 कोटी 42 लाखांच्या निधीचे नियोजन करणे बाकी आहे. या निधीतून 52 नवीन अंगणवाडींचे बांधकाम करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचे बाकी आहे. याच कामांवरून जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील आणि महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. अर्थात अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडून वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या असून आमचीच यादी अंतिम करण्याचा हट्ट दोघांकडून धरला जात आहे. याचे चित्र आज जिल्हा परिषदेत पाहण्यास मिळाले असून, अध्यक्ष त्यांच्या दालनातून आणि सभापती त्यांच्या दालनातून याद्या अंतिम करण्यासाठी चक्र फिरवत होते. अध्यक्षांच्या दालनात यावेळी पोपट भोळे, लालचंद पाटील, कैलास सरोदे उपस्थित होते. 

अध्यक्षांच्या अधिकारात जास्तीचे काम 
राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर काम वाटपाचे नियोजन करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले होते. त्यानुसार अध्यक्षांनी प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या कामांचे नियोजन केल्यानुसार महिला व बालकल्याण समितीतंर्गत असलेल्या अंगणवाडी बांधकामाचे नियोजन करत 52 नवीन अंगणवाडी बांधकामाची यादी तयार केली आहे. मात्र यात जास्तीचे कामे स्वतःकडे ठेवल्याचा आक्षेप सदस्य व सभापतींकडून केला जात आहे. यामुळे सभापतींनी दुसरी यादी तयार केली असून, सर्वांना काम दिल्याचे म्हटले जात आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. 

वादात कामे रेंगाळली 
नवीन अंगणवाडी बांधकामासाठी 4 कोटी 42 लाख रुपयांचे नियोजन करण्याचे काम बाकी आहे. यासाठी यादी तयार असताना त्यास अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. पदाधिकाऱ्यांच्या वादात प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून, कामे देखील रेंगाळली आहेत. 

अधिकाऱ्यांना बोलाविले बंगल्यावर 
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमधील काही कामांना प्रशासकीय मान्यता देणे बाकी आहे. अशा कामांना मान्यता देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षांनी विभाग प्रमुखांना सायंकाळी सहानंतर बंगल्यावर बोलावून घेतले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com