"जलयुक्त'ची पाणीदार गावे तहानलेलीच! 

"जलयुक्त'ची पाणीदार गावे तहानलेलीच! 

जळगाव ः राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने यंदा शेतकऱ्यांसह नागरिकांची निराशा केल्याचे चित्र आहे. दरवर्षी या अभियानाच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. ज्या गावांची या अभियानासाठी निवड केली होती त्यापैकी 454 गावे "जल परिपूर्ण' (पाणीदार) झाल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र जिल्ह्यात 521 गावे सद्यःस्थितीत तहानलेलीच आहेत. यासंदर्भात मात्र अभियानाची मुख्य जबाबदारी असलेल्या कृषी विभागाने यंदा पाऊसच कमी पडल्याने "जलयुक्त'च्या गावांत टंचाई असल्याचा दावा केला आहे. 
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात 2015-16 मध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 232 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये "जलयुक्त'अंतर्गत 7407 कामे करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 2016-17 मध्ये 222 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये 4857 कामे करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात 26 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये 4089 कामे हाती घेण्यात आली. पहिल्या दोन टप्प्यांत निवडलेली 454 गावे जलयुक्तच्या कामांमुळे जलपरिपूर्ण (पाणीदार) झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. 
या गावांमध्ये डिसेंबर, जानेवारीपर्यंत पाणीटंचाई नव्हती. ज्या गावाच्या परिसरात ही कामे झाली तेथील शेतांतील विहिरींना चांगले पाणी होते. पिकांची वाढही चांगली होऊन उत्पन्न चांगले येत होते. गावातील जनावरांसाठीही पाणी मुबलक होते. मात्र, जसजशी उन्हाची तीव्रता वाढली तसतसे "जलयुक्त'मधील मधील पाणी आटले. 
"जलयुक्त'च्या कामांमुळे या गावांमधील जलपातळीत वाढ होणे अपेक्षित होते; परंतु या गावांना आता पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती बिकट बनत चालली आहे. 521 गावांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचल्या असून, टंचाई आराखड्यांतर्गत या गावांमध्ये उपाययोजना राबविल्या जात आहेत. अमळनेर, पारोळा, जामनेर, चाळीसगाव या तालुक्‍यांत सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे "जलयुक्त'च्या कामांमुळेही शाश्‍वत पाणी मिळू शकत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने अभियानातील कामे अधिक चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात 120 टॅंकर सुरू 
टंचाई असलेल्या 138 गावांना सध्या 120 टॅंकरद्वारे पुरविले जात आहे. इतर 383 गावांमध्ये विहीर अधिग्रहण, कूपनलिका तयार करणे, विहिरींचे खोलीकरण, नवीन कूपनलिका खोदणे, विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबविणे आदी कामे सुरू आहेत. अमळनेर, पारोळा व जामनेर या तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाई आहे. सद्य:स्थितीत अमळनेर तालुक्‍यात 42 गावांमध्ये 23 टॅंकर, पारोळा- 23 गावांमध्ये 20 टॅंकर, चाळीसगाव- 26 गावांमध्ये 29 टॅंकर, जामनेर- 21 गावांमध्ये 21 टॅंकर, भुसावळ- 6 गावांना 7 टॅंकर, पाचोरा- 9 गावांना 9 टॅंकर, भडगाव- 4 गावांना 5 टॅंकर, बोदवड- 4 गावांना 3 टॅंकर, तर जळगाव तालुक्‍यात 2 गावांना 2 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

जलयुक्त शिवारांतर्गत यंदाही चांगली कामे झाली. यामुळे शेतकऱ्यांना फेब्रुवारीअखेर पिकांना पाणी देता आले. यंदा पाऊसच कमी पडल्याने "जलयुक्त'च्या कामांमध्येही पाणी हव्या त्या प्रमाणात जिरले नाही. 
- संभाजी ठाकूर, सचिव, जलयुक्त शिवार अभियान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com