भाव मिळत नसल्‍याने कांदा उत्‍पादक अडचणीत 

भाव मिळत नसल्‍याने कांदा उत्‍पादक अडचणीत 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंताग्रस्त झाले आहेत. मागील वर्षाचा उन्हाळी कांदा चाळीतच सडला मात्र भाव मिळाला नाही. आता यावर्षीच्या उन्हाळी कांदा निघण्यास सुरवात झाली असून, मात्र भाव नसल्याने अडचणीत असलेला शेतकरी अजून अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याने वांधा केला असून, कांद्याबाबत शासनाने ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी होत आहे. 
चाळीसगाव तालुक्यात मागील वर्षी एक हजार पाचशे हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी लागवड निम्माने घटली असून, ८५८ हेक्टरपर्यंत झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली. तालुक्याचे एकूण क्षेत्र ९५ हजार हेक्टर आहे. त्यात ऊस, मका, केळी आदी पिके घेतली जातात. तालुक्यात कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते लागवड करणे यावर खूप मोठा खर्च झालेला आहे. या वर्षी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने उन्हाळी कांदा लागवड देखील घटली आहे. आता काही शेतकरी कांदा काढण्यासाठी लगबग करत आहेत. तर काहींचे कांदे अजून शेतात उभे आहेत. राज्य शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात हे अनुदान काहींना मिळाले, तर काहींना मिळेलच नाही. याबाबत गावपातळीवर शेतकऱ्यांना कुठलीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे ‘माय जेवू देई ना अन बाप भीक मागू देई़' ना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कांद्याला अनुदान देण्यापेक्षा प्रतिक्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांचा हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. कांदा लागवडीसाठी मशागत, रोपे खरेदी खते, पाणी मजुरी वाहतूक गोण्या, आडत, हमाली, असा खर्च पहाता शेतकऱ्यांनी सतत सहा महिने शेतात राबवून कांद्याची काळजी घ्यावी लागते. आज मिळणाऱ्या भावाचा विचार करता उत्पादन खर्च देखील निघत नाही आहे. याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. काही शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या कांदा विकण्या आणि फेकण्यापेक्षा तो शेतातच टाकून जैविक खत म्हणून वापर करीत आहेत. 

वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम 
गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. अशा वातावरणात कांदा चाळीतील कांदा सडण्याची शक्‍यता असल्याने बहुतांश शेतकरी कांदा चाळीत न ठेवता, बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. मागीलवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडला होता. त्यामुळे जो भाव मिळेल, त्या भावात विकून शेतकरी मोकळे होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com