नाथाभाऊ निर्दोष आहेत, हे तर जाहीर करा..; समर्थकांचा दानवेंसमोर संताप; 

नाथाभाऊ निर्दोष आहेत, हे तर जाहीर करा..; समर्थकांचा दानवेंसमोर संताप; 

भुसावळ/जळगाव : "पक्षसंघटनेचं काम करायला सांगतात, त्याचा आढावा घ्यायला येतात.. पण, पक्षातील नेत्याचीच अशी अवस्था आहे, मग आम्ही काम कुणासाठी करायचं? नाथाभाऊंना मंत्रिपदापासून दूर ठेवत जिल्ह्याचं नुकसान केलं. मंत्रिपदाबाबत नका सांगू, पण किमान ते निर्दोष आहेत, हे तर जाहीर करा...' अशा शब्दांत रावेर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. भुसावळ येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत या विषयावरून महिला कार्यकर्त्या संतप्त झाल्या होत्या. 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या रावसाहेब दानवे व प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी आज भुसावळ येथील आयएमए सभागृहातील बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्राचा आढावा घेतला. मंडलाध्यक्ष, तालुकाध्यक्षांकडून आढावा घेत असताना काही महिला कार्यकर्त्यांमधून खडसेंबद्दलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 

कार्यकर्त्यांचा संताप 
या बैठकीत कार्यकर्त्यांनी जवळपास अर्धातास खडसेंच्या विषयावरून दानवेंना जाब विचारला. पक्षसंघटनेचा आढावा घेताना आम्ही काय केले, हे विचारले जात आहे. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यालाच अशी वागणूक मिळत असेल तर काम कुणासाठी करायचे? नाथाभाऊंना मंत्रिपदापासून दूर केल्यानंतर जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे, त्यावर कुणी बोलायला तयार नाही. खडसेंचे कार्यकर्ते म्हणून आमची कामे केली जात नाही, मग संघटनेसाठी आम्ही कशाला झटायचे? किमान नाथाभाऊंचा गुन्हा काय आहे, हे सांगा. नसेल तर ते निर्दोष आहेत, हे तरी जाहीर करा, अशा भावना व्यक्त करताना दोन-तीन महिला पदाधिकाऱ्यांच्या भावना दाटून आल्या होत्या. 
 
गुन्हा काय ते राज्याला कळू द्या : खडसे 
या विषयावर बोलताना खडसेंनीही "गेली चाळीस वर्षे मी पक्षात प्रामाणिकपणे काम करतोय. मला मंत्रिपदात अजिबात रस नाही. पण, माझा गुन्हा काय आहे ते या कार्यकर्त्यांना, राज्यातील जनतेला कळू द्या..' अशा शब्दात आपली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली. 
 
दानवेंचे पुन्हा "कानावर हात' 
भुसावळ येथील बैठकीत संतप्त कार्यकर्त्यांसमोर "नाथाभाऊ ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल..' अशी भूमिका घेणाऱ्या दानवेंना जळगाव येथे पत्रकार परिषदेत याबद्दल विचारले असता "नाथाभाऊंवरील एकही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. मात्र, त्यांच्यासंबंधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पक्ष त्यात काही करू शकत नाही', असे सांगत या विषयावर पुन्हा एकदा "कानावर हात' ठेवले. त्यामुळे या परस्परविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com