जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी "सतरा मजली'त सतरा फेऱ्या! 

जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी "सतरा मजली'त सतरा फेऱ्या! 

जळगाव ः जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंदणी महापालिकेत करणे अनिवार्य असते. महापालिकेने सर्वच प्रसूतिगृहे, पालिका रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात जन्म-मृत्यू रजिस्टर ठेवले आहे. ते दर आठ दिवसांत महापालिकेत दाखवून नोंदणी करून ते नागरिकांना दाखले देणे अपेक्षित आहे. त्यात आता संगणकीय दाखले देण्याची पद्धत सुरू झाली आहे. परंतु दोन महिन्यांपासून सर्व्हर डाऊन तसेच कर्मचारी नसल्याने दाखल्यांसाठी नागरिकांना महापालिकेच्या सतरा फेऱ्या माराव्या लागत आहेत. 
महापालिकेत जन्म-मृत्यू विभाग असून, येथून नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले देण्याचे कामकाज होते. परंतु गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून जन्म-मृत्यूचे दाखले दिलेल्या वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना वारंवार महापालिकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून उद्या या, परवा या, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. 

डिसेंबर, जानेवारीचे दाखले देणे सुरू 
जन्म-मृत्यू विभागाला शहरातील रुग्णालये, प्रसूतिगृहात जन्माला आलेल्या शिशूंची नोंद होऊन ती महापालिकेकडे दिली जाते. तसेच स्मशानभूमीत मृत्यू झालेल्याची नोंद महापालिका करीत असते. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने डिसेंबरमधील जन्म-मृत्यू दाखले देण्याचे काम या महिन्यात सुरू आहे. 

नागरिकांची होते फिरफिर 
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कर्मचाऱ्यांकडे दाखले घेण्यासाठी नागरिक दररोज आशेने येतात. परंतु सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून दोन-चार दिवसांनी या, असे सांगून नागरिकांना महिना- महिना दाखल्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 

महिनाभरापूर्वी सर्व्हर डाऊन 
महापालिकेत दीड-दोन वर्षांपासून जन्म-मृत्यूचे दाखले देण्यासाठी शासनाची सेंट्रल रजिस्ट्रेशन संगणक प्रणाली सुरू झाली आहे. परंतु एक महिन्यापूर्वी ही प्रणाली पंधरा दिवस बंद असल्याने अनेक जन्म-मृत्यूच्या नोंदी करणे राहून गेले. त्यामुळे जन्म-मृत्यूचे दाखले देण्यात विलंब होत असल्याचे कळते. 

नोंदणीसाठी केवळ एक कर्मचारी 
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात सहा कर्मचारी दाखले नोंदविण्याचे काम करीत होते. यातील तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर दोन कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाची ड्युटी लागल्याने त्यांची बदली झाली. केवळ एका कर्मचाऱ्यावर दाखले ऑनलाइन नोंदविण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना दाखले मिळण्यास चकरा माराव्या लागत आहेत. 

एजंटकडून आर्थिक लूट 
जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत; तर काही दाखले काढून देणारे एजंट नागरिकांकडून पैसे घेऊन लवकर देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे दाखला काढण्यासाठी भरलेली शासकीय शुल्क व्यतिरिक्त नागरिकांना लवकर दाखल्यासाठी जादा पैसे देऊन ते काढावे लागत आहेत. 

जन्म-मृत्यूचे दाखले देण्याचे सर्व्हर एक महिन्यापूर्वी 15 दिवस बंद होते. त्यामुळे अनेक कामे "पेंडिंग' पडले. तसेच काही कर्मचारी निवृत्त, तर काही निवडणूक कामाची ड्युटी लागल्याने केवळ आता एका कर्मचाऱ्यावर नोंदणीचे काम सुरू आहे. त्यामुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. 
- डॉ. विकास पाटील, जन्म-मृत्यू विभागप्रमुख, महापालिका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com