राज्यात सहा वर्षांत 21 नरबळीच्या घटना : कट्यारे

राज्यात सहा वर्षांत 21 नरबळीच्या घटना : कट्यारे

जळगाव : एकविसाव्या शतकातही अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दृष्ट प्रथांनी बाजार मांडला आहे. यापासून समाजातील सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्‍यक आहे. कारण समाजात वावरणाऱ्या तांत्रिक- मांत्रिक आणि भोंदू लोकांकडून चमत्कारातून भीतीचा खेळ उभा करून अघोरी कृत्याकडे नेण्यात येत असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष डी. एस. कट्यारे यांनी सांगितले. कायदा झाल्यापासून (वर्ष-2013) एकट्या महाराष्ट्रात नरबळीसारख्या गंभीर गुन्ह्यांची 21 प्रकरणे घडली आहेत, तर 250 च्यावर जादू टोण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अमलात यावा, यासाठी सुमारे सोळा वर्षे संघर्ष केला. त्यांच्या हत्येनंतर 12 डिसेंबर 2013 रोजी जादूटोणाविरोधी कायदा सर्वांत प्रथम महाराष्ट्रात अमलात आला. तेव्हापासून जवळपास 250 गुन्हे दाखल झाले असून, दोषींना शिक्षाही झालेल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत नरबळीसारख्या अमानवीय कृत्याची तब्बल 21 प्रकरणे समोर आल्याचे कट्यारे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. आजवर घडलेल्या नरबळींच्या प्रकरणांमध्ये दैविदृष्टी प्राप्त करण्यासाठी, गुप्तधनाचा शोध, भाऊबंदकीत मालमत्तेसाठीची दुश्‍मनीतून मुक्तता, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, अशा विविध समस्यांचे समाधान शोधण्यासाठी लोक भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडतात आणि त्यातूनच गंभीर गुन्ह्याचा जन्म होते. 

पायाळू असणे.. 
शंभरातून एखादे बाळ पायाकडून जन्म घेते..वैद्यकीय भाषेत याला ऍबनॉर्मल पद्धतीने प्रसूती झाल्याचे मानले जाते, मात्र हीच बाब हेरून भोंदू बाबांकडून त्याचा अपप्रचार होतो. काजळी लावून सट्टा लॉटरीचे अंक वदवले जातात आणि नरबळीसाठी पाच ते पंधरा वर्षातील मुलाची गरज असते, कारण प्रतिकार करण्यास आणि अयोग्य अयोग्य समजून घेण्यास या वयातील बालके अज्ञानी असतात, त्यांच्याकडून प्रतिकाराची शक्‍यताच नसते म्हणून वयाची अट ठेवली जाते हेच, लोकांना समजत नाही. 

मंत्र-तंत्रसिद्धीचा तमाशा 
प्रत्येकालाच समस्या आणि अडचणी असतात; मग त्यातून मुक्ततेसाठी मानसिक दुर्बल व्यक्ती बुवाबाबांचा मार्ग शोधतात, हा ग्राहक वर्ग आपसूक मिळणार असल्याने बाबाच्या वेशातील भोंदू आपले दुकान थाटतात. 

नकली नोटांचा पाऊस 
धंदेवाईक ज्या पद्धतीने जाहिरात, प्रसिद्धीतून ग्राहक मिळवतो, त्याचप्रमाणे भोंदूबाबांचाही उद्योग असतो. पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने कुठेतरी जंगलात वातावरण निर्मिती करून भोळ्याभाबळ्यांना बोलावले जाते. तंत्रमत्रसिद्धीचा तमाशा करून झाडावर, डोंगर कड्यावरून नकली नोटा फेकणारा बाबाचा माणूस तसा भास निर्माण करतो. यातूनच प्रसाद म्हणून सावज म्हणून ठरलेल्यांना नोटांचे बंडल दिले जाते. ग्राहक पक्का झाल्यावर त्याची सततची लूट सुरू होते. 

भडगावच्या प्रकरणात शक्‍यता 
भडगाव येथे 33 वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने चांगल्यापैकी संपर्कात आहे. धूलिवंदनाच्या दिवशी बेपत्ता बालकाचा निघृण खून झाल्याचे प्रकरण कानावर आले. तेथे जाऊन माहिती घेतल्यावर प्रथमदर्शनी संशय आल्याने आपण पोलिसांची भेट घेऊन संशयही व्यक्त केला होता, असेही श्री. कट्यारे यांनी सांगितले. 
 
चर्चेतील नरबळी 
- औरंगाबाद जिल्ह्यातील घाटी येथे एका रिक्षाचालकाने दिव्यदृष्टी प्राप्तीसाठी पायाळू मुलाचे डोळे व किडणी काढून नंतर त्याची भाजी करून खाल्ली दिव्यदृष्टी तर मिळालीच नाही. त्याला मात्र जेल मिळाली. आजही तो कारागृहात आहे. 
- मेहरुणच्या (जळगाव) सहा वर्षीय बालकाला नोटांचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने अपहरण करून त्याचा मुक्ताईनगरच्या जंगलात खून करून विहिरीत मृतदेह फेकण्यात आला होता. यात आदेशबाबा नावाच्या मांत्रिकाला अटक 
- यवतमाळ येथे एकाने आई व मावशीला तीन दिवस डांबून ठेवले..अमावस्येच्या रात्री दोघांना विवस्त्र जंगलात नेऊन मुलाच्या मांडीवर आईचा नरबळी देण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com