अनिश्‍चितता, अस्वस्थता अन्‌ घालमेल..! 

अनिश्‍चितता, अस्वस्थता अन्‌ घालमेल..! 

अनिश्‍चितता, अस्वस्थता आणि घालमेल या शब्दांची प्रचिती खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर जळगाव जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय स्थितीचे वर्णन करावे लागेल. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले.. त्यासाठी सज्जतेची तयारी करण्याचे दिवस असताना प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीवरुन कमालीची अनिश्‍चितता तर आहेच, शिवाय विद्यमान खासदारांसह संभाव्य उमेदवार आणि नेत्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.. निष्ठा अभावानेच राहिलेल्या प्रत्येक पक्षातच मग नेता आणि उमेदवारच निश्‍चित नाही तर काम कुणासाठी करायचे, ही कार्यकर्त्यांची घालमेलही स्वाभाविक म्हणावी लागेल.. 
--- 
लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना जळगाव जिल्ह्यातील राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. खरेतर हे दिवस सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने कसोटीचे.. एप्रिल-मेमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या परीक्षेस सामोरे जायचे.. त्यासाठी या परीक्षेचा अभ्यास करायचे.. पण, बुथमेळावे, बैठकांव्यतिरिक्त उमेदवारांनी व्यक्तिगत स्तरावर करावयाच्या संपर्क व प्रयत्नांना अद्याप गती मिळाळेली दिसत नाही. त्याची कारणेही तशीच गुंतागुंतीची. 
जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर युती होणार नाही, अशी शक्‍यता गृहीत धरून माजी आमदार आर. ओ. तात्यांनी तयारी सुरू केलीय. युती झाली तरी ही जागा मागायची, असा सेनेचा आग्रह राहील. परंतु, "सिटिंग' खासदाराची जागा भाजप देईल का? हा खरा प्रश्‍न. त्यामुळे आर. ओ. तात्यांसह सेनेत अस्वस्थता. विद्यमान खासदार ए. टी. नानांच्या उमेदवारीबाबत सहा महिन्यांपासून उलटसुलट चर्चा सुरू झालेली.. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवकर आप्पांकडे आग्रह धरला, मात्र त्यांना लोकसभेत "रस' नाही, म्हणून त्यांची नकारघंटा सुरु. अनिल भाईदास यांनी एकीकडे तयारी सुरू केल्याचे दिसत असले, तरी ऐनवेळी देवकरांच्या गळ्यात माळ पडली तर..? हा प्रश्‍न उरतोच. त्यामुळे राष्ट्रवादीतही अस्वस्थता. 
इकडे पूर्व जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे नावाचे वर्चस्व. भाजप सोडणार नाही, असे ते ठामपणे सांगत असले तरी खडसेंच्या हितशत्रूंनी रक्षाताईंच्या उमेदवारीबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण करुन ठेवलेले. दोन्ही कॉंग्रेसचे नेते खडसेंची वाट बघताय.. त्यामुळे राष्ट्रवादीकडे ही जागा असली तरी ती कॉंग्रेसला सोडायची की नाही, याचा निर्णय झालेला नाही. म्हणून कायमच तयारीत असलेल्या डॉ. उल्हास पाटलांनाही काम कुठून सुरू करायचे? हा प्रश्‍न. त्यामुळे तेदेखील अस्वस्थ. 
कार्यकर्त्यांच्या मनातील घालमेलही लपून राहिलेली नाही. कोणत्याही पक्षात आता निष्ठा अभावानेच राहिलेल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी काम कुणाचे करायचे? हा प्रश्‍न पडलाय. गेल्यावेळी सारा देश मोदींच्या पाठीशी उभा राहिला, भाजपचे तर सांगायलाच नको. पण, गेल्या चार वर्षांत भाजपतही अनेक स्थित्यंतरे घडली, खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याची अशी अवस्था झाली, मग सामान्य कार्यकर्त्याचे काय? या प्रश्‍नाने तोदेखील अस्वस्थ. ही सर्व स्थिती लक्षात घेतली तर अनिश्‍चितता, अस्वस्थता आणि घालमेल यांचा विचित्र त्रिवेणी संगम झालेला दिसतोय.. या संगमात सर्वांचेच भवितव्य टांगणीला लागलेले.. बघूया काय होते ते..! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com