डबघाईतील महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम 

डबघाईतील महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम 

जळगाव ः स्वउत्पन्नावर चालणाऱ्या "एसटी'ची चाके डबघाईत रुतलेली असतात. उत्पन्नवाढीसाठी गर्दीचा हंगाम किंवा यात्रोत्सवादरम्यान जादा बस सोडण्याचा प्रयत्न आगार स्तरावर केले जातात. यात बहुतांश यशही मिळते. परंतु जळगाव- पुणे- जळगाव या मार्गावर सततच्या 22 तास ड्युटीमुळे उत्पन्नावरही परिणाम होत असल्याची बाब समोर येत आहे. प्रामुख्याने बससाठी रिझर्वेशन केलेल्या प्रवाशांना शंभर टक्‍के "रिफंड' आणि कर्मचाऱ्यांना जास्तीचा "ओव्हरटाइम' द्यावा लागतो. 
राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा राज्यभर सुरू असून, ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाते. गावागावांत "लालपरी' म्हणून ओळखली जाणारी बस स्वउत्पन्नावर कारभार चालवत असते. बसफेऱ्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून बसचे मेंटेनन्स, डिझेल खर्चासह कर्मचाऱ्यांचे पगार केले जातात. राज्यात असे स्वउत्पन्नावर चालणारे एकमेव महामंडळ आहे. यातही "लालपरी'ला प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु जळगाव- पुणे- जळगाव या मार्गावर सलग 22 तास ड्युटीचे शेड्यूल चालविण्याचे काम सुरू आहे. अशा पद्धतीने धोकेदायक शेड्यूल्ड चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ चालला आहे; तर दुसरीकडे आपल्याच उत्पन्नावर परिणाम होत आहे. अर्थात ज्या मार्गावर अधिक उत्पन्न मिळत आहे त्याच मार्गावर अतिरिक्‍त खर्च करून उत्पन्नावर परिणाम करून घेतल्याचेही समोर येत आहे. 

सोळा तासांचा अतिरिक्‍त "ओव्हरटाइम' 
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) चालक, वाहकांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी पगार आहे. यामुळे आपली सेवा बजावताना "ओव्हरटाइम' करून जास्तीचा पगार घेण्याचा प्रयत्न असतो. मात्र, यात काही विशिष्ट कर्मचारीच "ओव्हरटाइम'च्या सेवा बजावतात. परंतु जळगाव- पुणे मार्गावर नियमानुसार बसफेरी न चालवता अवघ्या तासाभरात पुण्याहून जळगावकडे मार्गस्थ होतात. या प्रकारात चालक आणि वाहक यांना 16 तासांचा अतिरिक्‍त "ओव्हरटाइम' दिला जातो. मुळात नियमित वेळेनुसार मुक्‍कामी राहून बस चालवल्यास सहा तासांचा "ओव्हरटाइम' चालक, वाहकांना मिळतो. परंतु लागलीच परत झाल्यास सहा तासांव्यतिरिक्‍त सोळा तासांचा "ओव्हरटाइम' दिला जातो. 

रिझर्वेशनची रक्‍कमही द्यावी लागते परत 
लांबपल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महामंडळाने आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे आरक्षण प्रवाशांना "ऑनलाइन' करण्याची सुविधा आहे. अर्थात लांबपल्ल्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक बसकरिता आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्या दिवशी आरामदायी प्रवास करता येणे शक्‍य आहे. मात्र बस नियोजित वेळेनुसार पुण्याहून परत येत नसल्याने प्रवाशांचे रिझर्वेशन खाली जाते. अर्थात "एसटी'ला नवीन प्रवासी मिळत असले, तरी रिझर्वेशनमधून मिळालेली पूर्ण रक्‍कम संबंधित प्रवाशाला परत करावी लागते. यातूनही महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. 

"जळगाव- पुणे मार्गावर एका दिवसात रिटर्न होणे हा एक प्रकारे प्रवाशांच्या जिवाला धोका आहे. गाड्यांची कमतरता असल्याने प्रशासन असे करत असेल, तर ते करू नये. शिवाय चालक- वाहकांनी देखील ओव्हर टाईमच्या लाभापाई स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्‍यात टाकण्याच्या गोष्टी करू नये.' 
- सुरेश चांगरे, विभागीय अध्यक्ष, मान्यताप्राप्त कामगार संघटना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com