आठ दिवसांत समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण काढणार 

आठ दिवसांत समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण काढणार 

जळगाव ः "नरभक्षक' महामार्ग क्रमांक सहालगत समांतर रस्त्यांसाठी अडचणीचे ठरणारे वीजखांब, जलवाहिनी, पथदिवे, टेलिफोन लाइन व वृक्षांचा विषय आठ दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली; परंतु समांतर रस्त्याच्या कामांचे लेखी आश्वासन मिळत असेल, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा समांतर रस्ता कृती समितीतर्फे घेण्यात आला आहे. 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज महापालिका, महावितरण, जिल्हा पोलिस दल व "न्हाई'च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे, कृती समितीचे सदस्य नितीन लढ्ढा, भरत अमळकर, विष्णू भंगाळे, अनंत जोशी, डॉ. राधेश्‍याम चौधरी, विनोद देशमुख, फारुक शेख, सुशील नवाल, दिलीप तिवारी, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चंद्रकांत सिन्हा, पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे अधिकारी संजय तडवी, "बीएसएनएल'चे अधिकारी, रेल्वे अधिकारी रोहित थावरे, महापालिकेचे शहर अभियंता सुनील भोळे, विद्युत अभियंता एस. एस.पाटील, पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच. एस. खान आदी उपस्थित होते. 

यंत्रणा लागल्या कामाला 
बैठकीत समांतर रस्त्यांसाठी अडचण ठरणाऱ्या जलवाहिन्या, पथदिवे, वृक्ष, वीजखांब तत्काळ हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुक्त डांगे यांनी जलवाहिनी स्थलांतरासाठी व वृक्ष तोडण्याची परवानगी, उद्या (ता. 26) सायंकाळपर्यंत "न्हाई'ने समांतर रस्त्यांच्या मार्गाची आखणी करून दिल्यास येत्या महासभेत घेऊन आठ दिवसांत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. 

पुरेसा बंदोबस्त देणार 
"महावितरण'चे अधिकारी संजय तडवी यांनी आठ दिवसांत वीजखांब हलविण्यासंदर्भात "इस्टिमेट' तयार करून "न्हाई'कडे सोपविण्याची ग्वाही दिली. या कामात लागणारा बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, खासदार पाटील, आमदार भोळे यांनी समांतर रस्त्यांसाठी तत्काळ जागा मोकळी करून देण्याच्या सूचना केल्या. 

रेल्वेचेही सहकार्य 
रेल्वे प्रशासनातर्फे शिव कॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे "ड्रॉइंग' तसेच त्याला लागणारा एकत्रित खर्च हा "न्हाई'ला एका आठवड्यात सादर करतील, असे मान्य केले. रेल्वे उड्डाणपुलासंदर्भातील खर्च "न्हाई' करेल, असे श्री. सिन्हा यांनी स्पष्ट केले. 

समन्वय बैठक महत्त्वाची 
फक्त साडेसात किलोमीटरचे म्हणजेच खेडी ते खोटेनगर या टप्प्याचेच काम झाल्यास पुढील अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकणार नाही, यावरही विशेष चर्चा झाली. 19 नोव्हेंबरला "न्हाई'ने दिलेल्या पत्रानुसार निविदाप्रक्रिया देण्यास हरकत नाही. हे जरी सुचविले असले, तरी जळगाव महापालिका, वीज कंपनी, रेल्वे प्रशासन, बीएसएनएल, वन विभाग आदी सर्व विभागांची संबंधित कामे समन्वय करून 15 दिवसांच्या आत नवीन सुधारित आराखडा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. त्याअनुषंगाने आजची ही समन्वय बैठक अत्यंत महत्त्वाची होती. 

उपोषण सुरूच राहणार 
साखळी उपोषण थांबविणे यासंदर्भात समांतर रस्ते कृती समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असता, सर्व संबंधित विभागांचे लेखी पत्र "न्हाई'कडे घेऊन आजच्या बैठकीचा लेखी वृत्तांत मिळाल्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात येईल, असे स्पष्ट केले. हे साखळी उपोषण यापुढेही सुरू राहील, असेही समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com