सुट्यांमध्ये मुले नाही, तरीही पोषण आहार ! 

सुट्यांमध्ये मुले नाही, तरीही पोषण आहार ! 

जळगाव ः दुष्काळी परिस्थिती पाहून शासनाने उन्हाळ्याच्या सुटीतही शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून देण्याचा आदेश दिले आहेत. परंतु, उन्हाळ्याच्या सुटीत शाळेत पोषण आहार खाण्यासाठी विद्यार्थी येतील का, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिवाय दुष्काळ पडल्याने अनेक प्राथमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा नसल्याने आहार शिजवताना अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे हा उपक्रम यशस्वी होण्याबाबत शंका निर्माण केली जात आहे. 
राज्यात यंदा सर्वत्र दुष्काळ जाहीर झाला आहे. या दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागात अधिक दिसून येतात. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. शिवाय पाण्यासाठी अनेकांना कामावर दांडी मारावी लागते. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पिण्यासाठी पाणी कोठून आणणार? हा प्रश्‍न निर्माण झाला असताना ऐन उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहार शिजविण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शहरी भागातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, या हेतूने शासनाने उन्हाळ्याच्या सुटीतही शाळेत शालेय पोषण आहार शिजवून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

कडक उन्हात मुले येतील का? 
दुष्काळी स्थितीतही पोषण आहार मिळावा व पिण्यासाठी पाणी मिळावे, या हेतूने पोषण आहार देण्याचा उपक्रम चांगला आहे. परंतु, हा उपक्रम मुलांना पोषण आहार देणार नसून ठेकेदाराचे पोषण करणारा ठरू नये. शासनाचा उपक्रम चांगला असला तरी; मुळात आहार खाण्यासाठी मुलांची उपस्थिती आवश्‍यक आहे. कारण उन्हाळ्याच्या सुटीत शाळेत विद्यार्थी येत नाहीत. सुट्या लागल्या की बहुतांश मुले ही गावाला जात असतात. त्यामुळे सुटीच्या दिवसांत विद्यार्थी शाळेत नाही आला तर शालेय पोषण आहार शिजवून कोणाला खायला द्यायचा? हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

कागदोपत्री उपस्थिती 
जिल्ह्यातील तापमान 44 अंशावर पोहचले असताना या कडक उन्हात आहार घेण्यासाठी शाळेत मुले येऊ शकणार नाही. आहार शिजविण्याच्या नावाखाली आणि शाळेत खोटी पटसंख्या दाखवून हा आहार न शिजविता दुसऱ्या मार्गाने जाण्याची जास्त शक्‍यता आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहे. केवळ कागदोपत्री विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवून आणि आहार शिजविल्याचे दाखवून हे तांदूळ गैरमार्गाने जाण्याची शक्‍यता देखील नाकारता येत नाही. म्हणजेच शासनाने निर्णय घेतलेल्या या उपक्रमाचा फज्जा उडण्याचीच अधिक शक्‍यता आहे. कारण शाळेत विद्यार्थी नाहीच आले तर कोणीही शाळेत सकस आहार शिजविणार नाही. 

शाळा तपासणीच्या सूचना 
जिल्ह्यातील वाढलेल्या तापमानामुळे शाळेत मुलांची येण्याची शक्‍यता शून्यच आहे. अशात या उपक्रमात गैरप्रकार होऊ नये; याकरिता गटशिक्षणाधिकारी यांनी रोज तीन शाळांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहे. यात मुलांना पोषण आहार दिला जात आहे की नाही? याची तपासणी करावयाची आहे. मुलांची पटसंख्या तसेच भेट दिल्याचा फोटो व्हॉटस्‌ऍपवर टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com