...तर शिवाजीनगर पूल एका महिन्यात तयार झाला असता 

live photo
live photo

जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान साडेतीन ते चार किलोमीटर अंतराचा फेरा करावा लागतो. नागरिकांचे पुलाअभावी होणारे हाल पाहता हा पूल "मिलिटरी'ला बांधण्यास दिला असता तर हे काम किमान एक ते दोन महिन्यातच पूर्ण झाले असते. असे सुज्ञ नागरिकांना वाटते. 

पुलाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी "मिलिटरी'ला काम देवून करून घ्यावे, असा विचार महापालिका, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला नाही. जर मिलिटरी'ने पुलाचे काम करण्यास घेतले असते तर एकाच महिन्यात काम पूर्ण होऊन नागरिकांना होणारा त्रास थांबला असता. 

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावरून शिवाजीनगर परिसरातील पन्नास ते साठ हजार नागरिक, यावल, चोपडा, ईदगाव यासह अनेक ग्रामीण भागातून नागरिकांना दररोज ये-जा करावी लागत होती. ती आता पुलाच्या कामामुळे बंद झाली आहे. शाळकरी विद्यार्थी, नागरिकांना विविध कामांसाठी शहरात येताना त्रास सहन करावा लागतो. 
शिवाजी नगरातून आता नागरिकांना पर्यायी मार्गावरून ये-जा करावी लागते. हा मार्ग चार ते पाच किलोमीटर लांबच्या अंतरावर आहे. सुरत रेल्वे गेट ओलांडणे, मुमराबाद पुलाकडून असोदा गेटमार्गे शहरात येणे हे दोन मार्ग आहेत. शिवाजी नगरातून शहरात येण्यास लेंडी नाल्यावरील रेल्वेपुलाचे व नाल्यावरील पुलाचे काम अपूर्ण आहे. 

रेल्वेचाही खोळंबा 
रेल्वे पुलाचे काम करताना रेल्वेला शनिवार, रविवार असे दोन दिवस काम करण्यास रेल्वेचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. याचमुळे रेल्वेने सुरत, मुंबईकडे जाणाऱ्या दोन पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. शिवाय दररोज काही तास तरी रेल्वे गाड्यांचा खोळंबा होतोच. जळगावकडून भुसावळकडे दररोज अडीचशेच्यावर रेल्वेच्या एक्‍स्प्रेस, मेल, पॅसेंजर, मालगाड्या धावतात. पुलाचे कामामुळे रेल्वेचा वेग काही अंतरासाठी कमी करावा लागतो. यामुळे रेल्वे गाड्यांनाही उशीर होतोच. प्रवाशांचे हाल होतात ते वेगळे आहेतच. 
 
मुंबईत मिलटरीने बांधला होता पूल 
मुंबईत "ईलफिस्टन' पूल काही वर्षापूर्वी कोसळला होता. हा पूल मोठा असल्याने तो पूर्ण करण्यास इतर कोणत्याही विभागाला दिला असता तर खूप कालावधी लागला असता. तेवढा वेळ मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली असती. मात्र रेल्वेने तो पूल "मिलिटरी'कडे प्रस्ताव पाठवून पूल बांधण्यास सांगितला. "मिलिटरी'ने या पुलाचे काम अवघ्या एका महिन्यात पूर्ण केले होते. 
 
रेल्वेने शिवाजीनगर पुलाचे काम 18 महिन्यात पूर्ण करण्यास सांगितले आहे. मात्र आम्ही ते काम एकाच वर्षात पूर्ण करू. जानेवारी 2018 ला टेंडर काढले होते. दोन वेळा टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी 2019 ला काम सुरू झाले. रेल्वेने पुढाकार घेऊन हे काम सुरू केले आहे. नागरिकांना लवकरात लवकर हे काम पूर्ण करून दाखवू. 
-रोहित थावरे, उपअभियंता, रेल्वे विभाग भुसावळ 
 

मुंबई येथील पूल कोसळल्यानंतर त्या पुलाचे काम लष्कराला देण्यात आले होते. त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम देखील त्यांनाच द्यायला हवे होते. परंतु मनपा प्रशासन व रेल्वे प्रशासन केवळ वेळकाढूपणा करीत आहे. लोकप्रतिनिधी व स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेकदा मागणी करून देखील पर्यायी मार्गाचा प्रश्‍न सोडविण्यास अपयशी ठरले आहेत. 
-विलास सांगोरे, शिवाजीनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com