"हॉट सिटी' जळगावचा पारा 42 अंशांवर 

"हॉट सिटी' जळगावचा पारा 42 अंशांवर 

जळगाव ः "हॉट सिटी' म्हणून जळगाव जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्यात कहर म्हणजे यंदा मार्चमध्येच तापमानाने चाळिशी पार केली आहे. आज जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यात आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानाची स्थिती पाहून जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार केला आहे. जिल्ह्यात उष्माघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने डॉक्‍टरांकडून काळजी घेण्याचा सल्ला रुग्णांना दिला जात आहे. 
यंदा मार्चमध्येच जिल्ह्याच्या तापमानाने चाळिशी पार केली आहे. गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली असून, सकाळपासूनच नागरिकांचा रणरणत्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. एरव्ही शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकही दुपारच्या सुमारास तुरळक प्रमाणात सुरू असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. उन्हामुळे शरीरातील पाणी पातळी कमी होऊन उन्हाचा फटका बसल्याने उष्माघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. उष्माघात झालेल्या व्यक्तीला तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

रस्त्यांवरील वाहतूक मंदावली 
दिवसेंदिवस शहराच्या तापमानात वाढ होत आहे. आज शहराचे तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे सकाळपासूनच अंगाला उन्हाचे चटके सहन करावे लागले. त्यामुळे नागरिकही दुपारी बारापूर्वीच आपली कामे आटोपून घेत असल्याने दुपारी शहरातील रस्ते ओस पडलेले दिसून येत आहेत. 

ही आहेत उष्माघाताची लक्षणे 
नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात घाम सुटणे, घशाला कोरड पडून तहान लागणे, थकवा जाणवणे, शरीरातील तापमान वाढून ताप येणे, भूक न लागणे, चक्कर, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, उलटी होणे, मानसिक त्रास वाटून अस्वस्थ होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. 

बचावासाठी घ्यावयाची काळजी 
रणरणत्या उन्हात अधिक श्रमाची कामे करणे टाळावे, बाहेर पडताना डोक्‍याला रुमाल किंवा टोपी घालूनच जावे, घट्ट कपड्यांचा वापर टाळावा, अतिथंड पेये प्राशन करू नये, रसाळ फळांचे सेवन करावे, भरपूर पाणी प्यावे, रात्री घराच्या खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून घरामधील हवा खेळती राहील, अशक्तपणा जाणवू लागल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. 

चिमुरड्यांसह वृद्धांमध्ये उष्माघाताचे प्रमाण अधिक 
वाढत्या तापमानवाढीमुळे उष्माघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक चिमुरड्यांसह वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांनी उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तत्काळ उपचार घेणे आवश्‍यक आहे. 

जळगावसह जिल्ह्यातील वाढत्या तापमानासह होणाऱ्या बदलांमुळे उष्माघात होण्याची शक्‍यता असते. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शक्‍यतो रणरणत्या उन्हात जाणे टाळावे. थकवा जाणवल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडे जाऊन उपचार घेणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. विजय कुरकुरे, वैद्यकीय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com