काळ्या पाण्याच्या धरणाला गळती...वन्यप्राण्यांची होणार गैरसोय

काळ्या पाण्याच्या धरणाला गळती...वन्यप्राण्यांची होणार गैरसोय

नांद्रा (ता. पाचोरा) : परिसरातील विशेषतः वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरलेल्या काळ्या पाण्याच्या धरणातून सध्या पाणी गळती होत आहे. ही गळती अशीच सुरू राहिली तर भविष्यात वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे धरण वन विभागाच्या अख्यत्यारित येत असल्याने गळती रोखण्याचे आव्हान वन विभागासमोर ठाकले आहे. सद्यःस्थितीत धरणातून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुन्हा वापर करण्यासंदर्भातही योग्य तो विचार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

या भागातील सुमारे १५ हजार हेक्टरवरील वन विभागात लहान मोठे मातीबांध व धरणे आहेत. या धरणांमधील पाण्याचा वन्यप्राण्यांना उपयोग होतो. धरणांमध्ये पाणी राहिल्यानंतर वन्यप्राणी गावांकडे येत नाहीत. वन विभागाच्या अख्यत्यारित असलेले काळ्या पाण्याचे धरण प्राण्यांसाठी वरदान ठरले आहे. दोन वर्षापूर्वी सांडव्याचे व भिंतीच्या खालील भागात काळी माती टाकून वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले होते. त्यासाठी शासनाचा लाखोंचा निधी खर्च झाला होता. मात्र, धरणाची गळती थांबली नाही. यावर्षी झालेल्या दमदार व भिज पावसामुळे मुबलक पाणीसाठा धरणात असला तरी गळती सुरुच आहे. मे महिन्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काळ्या पाण्याच्या धरणातील पाणी नवे जुने होते. या धरणाच्या भिंतीवर मोठमोठी सुबाभळीची झाडी वाढली आहेत. धरणाच्या भिंतीवरील झाडेझुडपे काढून धरणाची गळती रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

मानवी हस्तक्षेप धोक्याचा 
धरणाच्या परिसरातील जंगलात आजूबाजूच्या गावांमधील पाळीव गुरे सर्रासपणे चराईसाठी सोडली जातात. गुरांसोबत गुराखी देखील असतात. शिवाय जंगलात शिकार करणारे किंवा तस्करी करणारे देखील फिरतात. त्यामुळे जंगलात होणारा मानवी हस्तक्षेप वन्यप्राण्यांसाठी धोक्याचा ठरत आहे. मानवी हस्तक्षेपामुळेच बऱ्याच वन्यप्राणी जवळच्या शेतांमध्ये येऊन पिकांची नासधूस देखील करीत असतात. त्यामुळे वन विभागाने जंगलात होणारा मानवी हस्तक्षेप तातडीने रोखावा, अशी मागणी होत आहे. यासोबतच सध्या धरणातून वाहून जाणारे पाणी वन विभागाताच्या हद्दीतच राहत असल्याने या पाण्याच्या पुनर्वापर कसा करता येईल, यादृष्टीने देखील प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे. 

नांद्रा वनक्षेत्रात बिबटे, नीलगायी, हरण, काळवीट, ससे, रानडुकरे यासारखे वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील असतो. काळ्या पाण्याच्या धरणातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही नक्की करू. 
- सुनील भिलावे, वनपाल, पाचोरा वन विभाग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com