भूलथापा देणारे फडणवीस सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

Nashik News Dhananjay Munde Criticizes Fadnavis Government
Nashik News Dhananjay Munde Criticizes Fadnavis Government

सटाणा : ''शेतमालाला भाव नाही, वाढती बेरोजगारी, महागाई, महिलांची असुरक्षितता हेच केंद्र व राज्यातील भाजपा शासनाचे फलित असून, या 'फसवणीस' सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा हल्लाबोल आहे. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना सपत्नीक बोलविण्यामागचा शासनाचा हेतू फक्त सत्यनारायणाच्या प्रसादाला बोलाविण्यासारखा होता. निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याच्या भूलथापा देणारे फडणवीस शासन कोसळल्याशिवाय राहणार नाही'', असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

येथील टिळक रोडवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल आंदोलनाच्या जिल्ह्यातील शेवटच्या प्रचारसभेत मुंडे बोलत होते. व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पाटील, आमदार पंकज भुजबळ, आमदार जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, विशाल काळघोर, आनंद परांजपे, प्रेरणा बलकवडे, श्रीराम शेटे, जयंत जाधव आदी उपस्थित होते. 

मुंडे म्हणाले, मोदींजीनी निवडणुकांपूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करण्याचे वचन दिले होते. मात्र गेल्या चार वर्षात सरकारच्या कृपेने ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी बँकांचे हजारो कोटी बुडवून फरार झाल्याने आता जनतेच्याच डोक्यावर प्रत्येकी १५ लाखाचे कर्ज होते की काय अशी अवस्था झाली आहे. सर्वसामान्यांच्या विरोधात फडणवीस सरकारचा कारभार सुरु आहे. त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. मागील निवडणुकीतील चूक पुन्हा होऊ देऊ नका, असे सांगायलाही मुंडे विसरले नाहीत. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र व राज्यात भाजपचे शासन आल्यापासून महिला व बेरोजगारांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. निधी आयोगाच्या अहवालानुसार या शासनाच्या कार्यकाळात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल इंडिया वायफायचा वापर झालाच पाहिजे. मात्र, मोदीजी व फडणवीससाहेब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन तुम्ही पाळले नाही, याचे काय. कांदा हसवू शकतो, रडवू शकतो व भाजपा शासनाला हलवूही शकतो. याचे भान ठेवा, असा सज्जड दमही सुळे यांनी दिला. 

तटकरे म्हणाले, दमणगंगेचे ५५ टीएमसी, नारपारचे ३२ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध होऊ शकते. मात्र, हे पाणी गुजरात राज्याला देण्याचा विचार राज्य शासनाने केला आहे. मात्र या योजनांचे थेंबभरही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही. निष्क्रिय, शेतकरीद्रोही शासनाची चीड आली आहे. जनतेचा रोष संताप अनावर झाला आहे. लोकभावनेची कदर करण्याची मानसिकता या शासनाची राहिलेली नाही, असा आरोपही तटकरे यांनी केला. 

यावेळी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, अॅड. रवींद्र पगार यांनीही भाषण केले. या सभेदरम्यान भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

सभेस शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे, जे.डी.पवार, फइम शेख, नगरसेविका सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, सुलोचना चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष रेखा शिंदे, उषा भामरे, वंदना भामरे, शमा दंडगव्हाळ, आबा शिंदे, नाशिक महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, वसंत भामरे, प्रेरणा बलकवडे, जयश्री आहेर, किरण पाटील, निखील पवार, अशोक सावंत, खेमराज कोर, अमोल बच्छाव, रोहित अहिरे, सचिन जाधव, नितीन सोनवणे, भारती पवार, विष्णुपंत म्हैसधुणे आदींसह कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com