महाराष्ट्राचे पाणी पळविल्याच्या आरोपाला पुष्टी, माजी आमदार भोसलेंच्या लढ्याची राज यांच्याकडून दखल 

residentional photo
residentional photo

नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे थेंबभर पाणी गुजरातला जाऊ देणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून केला जात असतानाच गुजरातच्या कच्छ व सौराष्ट्र भागात महाराष्ट्राचे 1,330 दशलक्ष घनमीटर पाणी वळविण्याचे प्रस्तावित असल्याचे शासनाच्या उपसचिवांकडून सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार नितीन भोसले यांनी पुराव्यानिशी केल्याने शासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड येथील भाषणात नाशिकचे पाणी गुजरातला पळविल्याच्या केलेल्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे. 

    महाराष्ट्रातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला मिळणारे 157 टीएमसी पाणी गोदावरी व गिरणा या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी माजी आमदार नितीन भोसले लढा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर जुलै 2015 मध्ये सुनावणी देताना शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे म्हणणे मांडण्यास सांगितले; परंतु राज्य शासनाच्या दबावामुळे समितीने अद्याप भोसले यांना दाद दिली नाही. त्यानंतर मार्च 2016 मध्ये भोसले यांनी राज्याच्या सचिवांना पत्र लिहून दमणगंगा-पिंजाळ व नार-पार खोऱ्यातील 157 टीएमसी पाणी महाराष्ट्रासाठी राखून ठेवण्याचे पत्र दिले. त्यावर जलआराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापण्याचे जाहीर केले.

   एप्रिल 2016 मध्ये समितीने काही निष्कर्ष काढले. त्यात गोदावरी व गिरणा हे तुटीचे खोरे असल्याने गुजरातला थेंबभर पाणी देऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, शासनाच्या उपसचिवांनी 1 एप्रिल 2019 ला श्री. भोसले यांना पत्र लिहून खुलासा केला आहे. त्यात पार-तापी-नर्मदा या आंतरराज्यीय नदीजोड योजनेंतर्गत गुजरातमधील कच्छ व सौराष्ट्र भागातील सिंचन व पिण्यासाठी 1,330 दशलक्ष घनमीटर पाणी वळविण्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटल्याने शासनाची पाण्यावरून दुटप्पी भूमिका समोर आल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. 

कॉंग्रेसवरचा आरोप चुकीचा 
कॉंग्रेस सरकारच्या काळात मे 2016 मध्ये महाराष्ट्र व गुजरातमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. त्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी देण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे भाजपकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, चुकीची माहिती भाजपकडून पसरवली जात आहे. मुळात सामंजस्य करारात गुजरातला पाणी दिल्याचा कुठलाच उल्लेख नसल्याचे स्पष्ट करताना भोसले यांनी भाजपच्याच सत्ताकाळात गुजरातला पाणी दिले जात असल्याचे सांगून यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबाव असल्याचा आरोप केला. 

महाराष्ट्राचे हक्काचे 1,330 दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातच्या मधुबन धरणात पोचवून पुढे कच्छ व सौराष्ट्रात पाठविले जाणार आहे. सरकार महाराष्ट्रातील जनतेला फसवत आहे. गुजरातच्या 600 किलोमीटरपर्यंत महाराष्ट्राचे पाणी जाऊ शकते; परंतु अवघ्या शंभर किलोमीटरवर असलेल्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पाणी का पोचू शकत नाही? 
- नितीन भोसले, माजी आमदार 

जागा महाराष्ट्राची, पाणी गुजरातला 
महाराष्ट्राकडे निधी नसल्याने पार-तापी-नर्मदा नदीवर 16 टीएमसी क्षमतेचे महाराष्ट्राच्या हद्दीत धरण बांधले जाणार असून, त्यासाठी लागणारा 10,211 कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे; परंतु हे पाणी महाराष्ट्रासाठी नसून ते गुजरातला दिले जाणार आहे. 16 टीएमसी पाणी तापी धरणातून उचलू, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. यापूर्वी शंभर टीएमसी पाणी उतारामुळे तापीतून उचलता येत नसल्याने त्या तुटीच्या पाण्यात आणखी 16 टीएमसी पाण्याची भर टाकली जाणार असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com