रावळगावात पुन्हा सोन्याचा धूर निघेल,साथ द्या,आ.भाई जयंत पाटील

live
live

मालेगाव : दुष्काळ व प्रतिकुल परिस्थितीत रावळगाव साखर कारखाना घेतल्याने जबाबदारी वाढली आहे. असे आवाहनात्मक काम करण्यात मला समाधान व आनंद मिळतो. रावळगाव गावाच्या नावाने कारखाना असल्याने या गावाचा नावलौकिकाला साजेसे काम करु. लोकांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. वर्षभर सहकार्य करा. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने रावळगावमधून पुन्हा सोन्याचा धूर काढू असे भावनात्मक आवाहन आमदार भाई जयंत पाटील यांनी गुरुवारी (ता.15) सायंकाळी केले.

रावळगाव (ता. मालेगाव) येथील एस. जे. शुगर डिस्टीलरी ॲन्ड प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी गव्हाण पुजनाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, कारखान्याचे अध्यक्ष तुषार गोसावी, माजीमंत्री मिनाक्षीताई पाटील, महाराष्ट्र मल्टी स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष रावल सरकार, टकले ज्वेलर्सचे संचालक सतीश टकले, रिलायबल शुगरचे अध्यक्ष सुप्रियाताई पाटील, चित्रलेखाताई पाटील, भरत पाटील, नृपाल पाटील, कामगार नेते डी. एल. कराड आदी प्रमुख पाहुणे होते. अध्यक्ष गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
     आमदार भाई जयंत पाटील म्हणाले,दुष्काळामुळे परिसरात चाळीस किलोमीटर अंतरावर ऊस नाही. अशा परिस्थितीत ही बिकट वाट सुलभ करण्याचे आवाहन आहे. साखर कारखान्यांना उर्जितावस्था येण्यासाठी साखरेला शासनाने 36 रुपये हमीभाव द्यायला हवा. यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक भाव देता येईल. कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांना काट्यावर पेमेंट देऊ. यासाठी उत्पादन खर्चात कपात करुन शेतकऱ्यांच्या पदरात अधिक देण्याचा प्रयत्न करु. राज्यात सर्वाधिक दर देणारा हा कारखाना असेल. साखर कारखान्याबरोबरच इथेनॉल, वीज निर्मिती या प्रक्रिया उद्योगांना चालना देऊ. यातून रोजगार निर्मितीला हातभार लागेल.

कष्टकरी,शेतकरी,कामगारांचा सहभाग हेच यशाचे फलित
सकाळचे संपादक श्री. माने म्हणाले, रावळगाव वैभवशाली परिसर आहे. देशातील खासगी क्षेत्रातील पहिल्या कारखान्याचा पुन्हा धुर निघतो आहे याचा आनंद आहे. या आनंदात कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना सहभागी करुन घेतले यातच कारखान्याचे फलीत दडले आहे. यावर्षी वसाका, बेलगंगा पाठोपाठ आज रावळगाव हे बंद पडलेले कारखाने सुरु झाले. उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने हा सुवर्णक्षण आहे. चळवळीतील माणसे व कष्टकरींच्या आयुष्यात भाईंनी आनंद पेरला. डाळींब, कांदा यासह वेगवेगळे प्रयोग व कष्टातून या परिसराचे वैभव वाढले आहे. काटा पेमेंट व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशी ग्वाही भाईंनी दिली आहे. आवर्षणग्रस्त भागातील पाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिल्यास आपले हक्काचे पाणी कोठेही जाणार नाही.

रावल सरकार म्हणाले, की रायगड वासियांचे खानदेशात स्वागत करतो. खानदेशमधून रावळगावला मोठ्या प्रमाणावर ऊस मिळेल. पाच लाखापेक्षा अधिक गाळप होईल. गोकुळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप नाईक यांनी सुत्रसंचालन केले. कारखान्याचे मुख्य अभियंता भगवान पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कारखान्याचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com