Vidhan sabha : प्रगतशील चाळीसगाव तालुका घडविण्याचा संकल्प : राजीव देशमुख  

rajiv deshmukh sakal sanwad
rajiv deshmukh sakal sanwad

आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा तालुका खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम झाला पाहिजे यादृष्टीनेच आपले ‘व्हीजन’ राहिले आहे. जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात आपला तालुका अग्रेसर राहावा, यासाठी प्रगतिशील चाळीसगाव तालुका घडविण्याचा आपण संकल्प केल्याचे माजी आमदार तथा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार राजीव देशमुख यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले. 

आपली भूमिका स्पष्ट करताना राजीव देशमुख यांनी सांगितले, की यापूर्वी २००९ मध्ये तालुक्यातील जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला. मतदारसंघाचा जागृत लोकप्रतिनिधी म्हणून सुरवातीपासूनच शासन दरबारी विविध प्रश्‍नांचा पाठपुरावा करून विकासकामे करण्यावर भर दिला. तालुक्यातील बेरोजगारीचा गंभीर प्रश्‍न त्यावेळी निर्माण झालेला होता. त्यामुळे तालुक्यात ‘एमआयडीसी’च्या प्रश्‍नाला चालना मिळावी म्हणून हा विषय मार्गी लावला. या ठिकाणी भारत वायर रोप व गुजरात अंबुजा यासारख्या दोन मोठ्या कंपन्या आणल्या. केवळ उद्योग येऊन उपयोग नाही, तर त्या उद्योगांना पोषक वातावरण असावे व विशेषतः उद्योगांना लागणाऱ्या वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘एमआयडीसी’त स्वतंत्र वीज केंद्राचा प्रश्‍न प्राधान्याने सोडवला. 

सिंचन योजनेला प्राधान्य 
पाणीप्रश्‍नाबाबत श्री. देशमुख म्हणाले, की तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला बाराही महिने पाणी मिळाले पाहिजे, यासाठी गाव तिथे सिंचन योजनेला प्राधान्य दिले. ज्या काही अपूर्ण योजना होत्या, त्या पूर्ण करण्यावर भर दिला. वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला. या कामाला सुरवातीलाच भरीव निधी शासनाकडून मिळाल्याने काम सुरू केले. असाच निधी नंतरच्या काळात मिळाला असता, तर आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला असता. एक आमदार म्हणून आपल्या तालुक्यासाठी जे जे काही चांगले करता येईल, ते करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला आहे. शहरवासीयांचा पाणीप्रश्‍न उन्हाळ्याच्या काळात गंभीर होत होता. त्यामुळे येथील नागरिकांना बाराही महिने शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ७५ कोटीची गिरणा उद्भव योजना तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून राबवली. पालिकेच्या माध्यमातून झालेल्या या कामामुळे राज्यात उन्हाळ्यात इतरत्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना माझ्या चाळीसगाववासीयांना पाण्याची टंचाई भासली नाही, याचे मनस्वी समाधान आहे. तसेच तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडूंची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी असलेला क्रीडा संकुलाचा प्रश्‍न सोडवला. 

रस्ते, आरोग्य, शिक्षणावर भर 
श्री. देशमुख म्हणाले, शहराची गरज लक्षात घेऊन अद्ययावत स्मशानभूमी उभारली. शहरात सुसज्ज असे उद्यान असावे यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र जिमची व्यवस्था, बालगोपाळांना खेळण्यासाठी उत्तम सोय असलेले उद्यान उभारले. गरीबांच्या निवासासाठी घरांचा प्रकल्प पूर्णत्वास आणला. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने ग्रामीण भागात विविध विकासकामांसाठी निधी दिला. ज्यामुळे खेड्यापाड्यातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यासारखे प्रश्‍न सोडवता आले. आपल्या कार्यकाळात तालुक्यात जातीय सलोखा जपून विविध सण, उत्सव एकोप्याने साजरा झाले. तालुक्यातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त जीवन जगता यावे, यासाठी गुंडगिरीला कुठेही थारा न देता खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था राखता आली. 

जनतेचा आपल्यावर विश्‍वास 
केवळ आपल्याला येथील जनतेने आमदार केले आहे म्हणून नव्हे तर सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आपण येथील जनतेचे प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य दिले. तालुक्यातील सिंचनासह अनेक प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. बदलत्या काळानुसार तालुका ‘हायटेक’ झाला पाहिजे, यादृष्टीने विकासाचे ‘व्हीजन’ डोळ्यांसमोर ठेवले आहे. येथील नागरिकांच्या प्रश्‍नांची आपल्याला चांगली जाण असल्याने ते सोडविण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा मतदारांसमोर जात आहे. येथील जनता हेच आपले सर्वस्व असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याच्या विधिमंडळात या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असा विश्‍वास असल्याचे राजीव देशमुख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com