सावत्र मुलांना दुजाभाव देण्याच्या संशय; पतीने केला पत्नीचा खुन 

सावत्र मुलांना दुजाभाव देण्याच्या संशय; पतीने केला पत्नीचा खुन 

शिरपूर  : सावत्र मुलांना दुजाभावाची वागणूक देत असल्याच्या कारणावरून घरजावयाने पत्नीचा विळ्याने गळा कापून निघृण खून केल्याची घटना तिखीबर्डी (ता.शिरपूर) येथे बुधवारी (ता. १२) दुपारी घडली. सांगवी पोलिसांनी तातडीने तपास करीत फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला रात्री उशिरा अटक केली. 

जतनसिंह रुलज्या पावरा (रा. न्यू बोराडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याचा काल दुपारी पत्नीशी वाद झाला. आपल्या मुलांना ती सावत्रपणाने वागवते, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. सांभाळत नाही असे आरोप त्याने केले. कडाक्याच्या भांडणात तिनेही पतीला दुरुत्तरे केली. त्याचा संताप टोकाला पोहचला. झोपडीतील विळा उचलून त्याने तिच्या मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात ती जागीच निपचित पडली. त्यानंतर बराच वेळ झाला तरी झोपडीत काहीच हालचाल होत नाही हे पाहून तिचे वडील नवलसिंह बंडू पावरा घटनास्थळी गेले. तेथे गतप्राण झालेल्या मुलीचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी शेजारील शेतकऱ्याच्या मदतीने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जतनसिंह विरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने तपासाला सुरवात केली. संशयिताचा माग काढत पोलिस न्यू बोराडी या त्याच्या मूळ गावी जाऊन पोहचले. तेथील शेतात लपून बसलेल्या जतनसिंहला त्यांनी अटक केली. तो न्यू बोराडीमार्गे मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय आहे. 

संसार फुललाच नाही 
जतनसिंहचे मूळ गाव न्यू बोराडी आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने पहिल्या पत्नीला फारकत दिली. तिच्यापासून असलेली दोन मुले त्याच्याकडेच राहतात. त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्याचे कुटुंब सून शोधत होते. तिखीबर्डी येथील नवलसिंह पावरा यांची मुलगी रालूबाई (वय ३२) हिच्या पतीचे निधन झाल्याने ती मुलासह माहेरी राहत होती. ही माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबानी सोयरीक जुळवली. जतनसिंहला सासरे नवलसिंह यांनी घरजावई करुन घेतले. तिखीबर्डी येथील स्वतःची शेती कसण्यासाठी दिली. तिथे झोपडीही बांधून दिली. घटस्फोटित जतनसिंह व विधवा रालूबाई यांचा नवा संसार सुरू झाला मात्र बहरला नाही. रालूबाई स्वतःच्या मुलातच गुंतली आहे, तिचे सावत्र मुलांवर प्रेम नाही असा संशय घेऊन जतनसिंह तिच्याशी नेहमीच भांडण करीत होता. त्याचे पर्यावसान अखेर तिच्या खुनात झाले. दोन वर्षातच उभयतांचा संसार कायमचा आटोपला. रालूबाई आणि जतनसिंह या दोघांची मुले मायेच्या सावलीला दुरावली. 

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com