मालेगाव - राजकारणाच्या गदारोळात मनसे शहरातून भुईसपाट झाली आहे. गेल्या निवडणुकीत कडवे आव्हान देणारी मनसे या वेळी एकही उमेदवार देऊ शकली नाही. बाळासाहेब अहिरे व गुलाब पगारे या दोन्ही नगरसेवकांनी अनुक्रमे शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन वर्षांपूर्वीच पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. तालुकाध्यक्ष पप्पू पवार यांनी शिवसेनेची वाट धरली. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीचे खातेही उघडले नाही.
2012 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची जोरदार हवा होती. उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसून आली. पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातही उमेदवार दिले होते. शिवसेनेपुढे मनसेने कडवे आव्हान उभे केले होते. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे मोठी जाहीर सभा झाली होती. निवडणुकीत दोन नगरसेवक निवडून आले होते, तर सहा ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पाच वर्षांत पक्षाची वाताहत झाली. महापालिका निवडणुकीत मनसेकडून कोणी इच्छुक दिसले नाही. जिल्हा पातळीवरील नेत्यांनीही तसे प्रयत्न केले नाहीत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप, शिवसेनेत विखुरले गेले. निवडणुकीत माकप, भाकप, समाजवादी पक्ष अशा छोट्या पक्षांचे अस्तित्व टिकून आहे. गेल्या निवडणुकीत मोठी हवा निर्माण केलेल्या मनसेचे नामोनिशाण शिल्लक नाही.
शहरासाठीचा बहुप्रतीक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मंजूर झाला असून, त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. एकीकडे शहरवासीयांना रेल्वे इंजिनची प्रतीक्षा असतानाच मनसेचे रेल्वे इंजिन मात्र रुळावरून घसरले आहे. गेल्या पाच वर्षांत पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. जिल्हा व प्रदेश पातळीवरील नेत्यांनी मालेगावकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या दोन्ही नगरसेवकांनी उपमहापौर युनूस ईसा यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीत नोंदणी केली होती.
|