कापडणे (जि. धुळे) - मोबाईल असणे किंवा वापरणे ही आजची गरज झाली असली तरी त्याच्या अतिरेकी वापरामुळे आता शिक्षकांना "मोबाईल नको' असे सांगण्याची वेळ कापडणेच्या ग्रामस्थांवर आली आहे. शिक्षकांकडून मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगून ग्रामपंचायतीमार्फत या शाळांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकसंख्येनुसार कापडणेत 15 अंगणवाड्या व जिल्हा परिषदेच्या पाच शाळा आहेत. शाळेत शिक्षक सतत मोबाईलवरच असतात असे मुलांनी वारंवार सांगितल्याने त्यातून निर्माण झालेल्या असंतोषावर ग्रामसभेत वादळी चर्चा झाली. ग्रामसभा तब्बल अडीच तास चालली. अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र पाटील होते.
अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील पोषण आहार व शिक्षण याकडे लक्ष द्या, नियंत्रण ठेवा. गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पंचायतीने लक्ष घालावे अशी सूचना मांडली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक शिकविण्यापेक्षा मोबाईलवरच जास्त वेळ असतात, त्यामुळे वर्गात शिकविले जात नाही. मुलांची प्रगती खुंटत चालली आहे. यांसह विविध तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे शाळांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्याचा व चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.
|