मोदींचा फोन, त्रिपुराचा रस्ता अन्‌ डॉ. महात्मे

मोदींचा फोन, त्रिपुराचा रस्ता अन्‌ डॉ. महात्मे

इंदिरानगर (नाशिक) - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यांशी स्वतः संपर्क साधून, जिल्ह्याच्या सीमेलगत परंतु आसामच्या हद्दीतील २० किलोमीटर महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत चर्चा केली. हा रस्ता अवघ्या पंधरा दिवसांत तयार करण्यास सांगितले. कारण तो त्रिपुराला देशाशी जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यानुसार तो पूर्णही झाला’ या आशयाची व्हॉट्‌सॲप आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट आठवते...?

नाशिककरांसाठी या पोस्टचे महत्त्व असे, की त्यातील संबंधित जिल्हाधिकारी, म्हणजे डॉ. संदीप महात्मे नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, भाटवाडी (ता. सिन्नर) येथील रहिवासी आहेत.

सिन्नरच्या महात्मा फुले विद्यालयाचे निवृत्त शिक्षक नामदेव महात्मे यांचे ते पुत्र असून, इंदिरानगरमधील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील खोडे यांचे जावई आहेत. सुटीच्या निमित्ताने ते आज नाशिकला आले असताना, त्यांच्याशी चर्चा केली असता या देशभर गाजत असलेल्या कामाची माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली.

प्रोटोकॉलनुसार जुलैमध्ये पंतप्रधानांशी झालेल्या संभाषणाची थेट चर्चा करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, थेट पंतप्रधान बोलत असल्याचे समजताच, सुरवातीला विश्‍वासच बसला नाही. तसेच काही क्षण नेमके काय बोलावे, हेदेखील सुचले नाही, हे मात्र त्यांनी प्रांजळपणे सांगितले. त्यानंतर मात्र त्यांनी, पंधरा दिवसांऐवजी चार दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून आणि पूर्ण २० किलोमीटर रस्ता दहा दिवसांत पूर्णत्वास नेल्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जानेवारी २०१६ मध्ये डॉ. महात्मे यांची उत्तर त्रिपुरा येथे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली. आसाम, मिझोराम आणि बांगलादेशच्या सीमेवरचा हा भाग असून, तेथील बहुतांश लोकसंख्या बंगाली आणि आदिवासी आहे. आसाममार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ द्वारे त्रिपुरा देशाशी जोडले गेले आहे; परंतु गेली १५ वर्षे आसाम सरकारकडून या रस्त्याची डागडुजी झाली नाही. त्यामुळे जुलैमध्ये येथे इंधन, खाद्य आणि अन्य साहित्य घेऊन येणारे दोन हजार ट्रक थांबून होते. भयंकर दंगल उसळेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्रिपुराचा देशाशी संपर्कच तुटला होता. इंधनदेखील पाच किलोमीटर रांगेद्वारे व तेदेखील अवघे शंभर-दोनशे रुपयांचेच मिळत होते.

ही बाब त्रिपुरामधील खासदारांनी पंतप्रधानांच्या कानावर घातली. त्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः संपर्क साधला आणि संपूर्ण अधिकार देत, आसामच्या हद्दीत असलेल्या समांतर रस्त्याचे काम पंधरा दिवसांत करण्यास सांगितले. देशाच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच घटना असेल, ज्यात अन्य राज्यातून आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले.

कारकीर्दीतील रोमांचक उद्दिष्ट

अहोरात्र काम केल्याने संपूर्ण यंत्रणा थकली होती. त्यामुळे एक दिवसाची सुटी घेतली आणि त्यापुढील पाच दिवसांत पुन्हा ६५० ट्रक माल वापरून २० किलोमीटर लांबीचा हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: खुला केला. त्यानंतर मोठे पाऊस झाले. त्यात हा रस्ता मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्या सहा वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वार्थाने रोमांचित करणारे हे उद्दिष्ट होते, असे आपण मानतो, असेही डॉ. महात्मे यांनी या वेळी सांगितले.

शेकडो मजूर, स्थानिक सहभाग, अनेक अधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री सोबत घेत काम सुरू केले. चार दिवसांत वाहनांना येथून जाण्याचा मार्ग सुरू करून घेतला. त्यामुळे जनक्षोभ थोडा निवळला. 

- डॉ. संदीप महात्मे, जिल्हाधिकारी, उत्तर त्रिपुरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com