crime-logo
crime-logo

मूलबाळ होत नसल्याने पतीकडूनच पत्नीचा खून 

नाशिक : भगूर येथील 32 वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची अखेर उकल झाली आहे. नातलगांनी बनवाबनवी करून गळफास घेतल्याचे सांगितले, तर शवविच्छेदन अहवालातून गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. तरीही पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता. "सकाळ'मधून शवविच्छेदन अहवालाच्या माहितीसह वृत्त प्रसिद्ध होताच अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस तपासातून, विवाहितेला 13 वर्षांत मूलबाळ न झाल्याने पतीनेच गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. संशयित पती नितीन पाटील याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने सोमवार (ता. 10) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

आरती पाटील (वय 32, रा. विजयनगर, भगूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. 22 नोव्हेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास आरतीचा गळा आवळून खून करण्यात आला. तिने गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी देवळाली कॅम्प पोलिसांना सांगितले. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र विवाहितेच्या शवविच्छेदनानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा रुग्णालयाचे फॉरेन्सिक एक्‍स्पर्ट डॉ. आनंद पवार यांनी तसा अहवालही दिला. शवविच्छेदन अहवालाची प्रत "सकाळ'च्या हाती लागली. त्या संदर्भातील वृत्त 28 नोव्हेंबरला प्रसिद्ध होताच 29 नोव्हेंबरला देवळाली कॅम्प पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेच्या सासर व माहेरकडील मंडळींकडून माहिती मिळण्यास पोलिसांना कठीण जात होते. अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल केली. 

आत्महत्येचा बनाव 
पोलिस तपासामध्ये विवाहिता आरती व नितीन यांचा विवाह होऊन 13 वर्षांत त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळेच संशयित नितीनने आरतीचा 22 नोव्हेंबरच्या रात्री गळा आवळून खून केला. तसेच तिनेच गळफास घेतल्याचे भासविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com