नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आजपासून शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील, तसेच महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत येणाऱ्या सर्व देशी, विदेशी दारू दुकानांसह बिअर बार आणि हॉटेल बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आजपासून त्याचा कडक अंमल सुरू झाला. उद्याही सील लावण्याचे काम सुरूच राहणार आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात एक हजार 111 परवानाधारक दुकाने, बिअर बार, हॉटेल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिलपासून त्यांपैकी
महामार्गावरील, तसेच त्यापासून पाचशे मीटर अंतरावरील दुकानांचे परवाने नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला. महामार्गापासून विहित अंतराच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात साठ ते पासष्ट टक्के हॉटेल आणि बारला थेट फटका बसला. मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे, औरंगाबाद असे वेगवेगळे राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जातात. जिल्ह्यातील 15 तालुक्यांच्या जिल्ह्यातील बहुतांश दारू दुकाने, बिअर बार हे रस्त्याला लागूनच आहेत.
शहरात सर्वाधिक संख्या
तीन प्रमुख महामार्ग जात असल्याने नाशिक शहरात परवानाधारक दुकानांची संख्या सर्वाधिक आहे. ग्रामीण भागातील महामार्गावर शहराच्या तुलनेत निम्मीही संख्या नाही. आदेशानुसार, आजपासून या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी सुरू झाली. शहर व जिल्ह्यात एक हजार 111 पैकी 680 दुकाने बंद होती. अनेक ठिकाणी उशिरापर्यंत सील लावण्याचे काम सुरू होते.
|