नाशिक - सोनई (जि. नगर) येथील प्रेमप्रकरणातून तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल सोमवारी (ता. 15) जाहीर केला जाणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असून, सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली आहे.
सोनई (जि. नगर) येथील गणेशवाडी शिवारात घटना घडली होती. पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. संस्थेत शिपाई असलेल्या सचिन सोहनलाल घारू व सीमा यांची ओळख होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले. याची कुणकुण दरंदले कुटुंबीयांना लागताच सीमाचे वडील व गुन्ह्यातील संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले व त्यांच्या नातेवाइकांनी सचिनच्या हत्येचा कट आखला. दरंदले वस्तीवरील शौचालयाचे सेफ्टी टॅंक दुरुस्तीचा बहाणा करून वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना डिसेंबर 2013 ला वस्तीवर बोलावून घेतले.
त्यानंतर संदीप थनवार यांना सेफ्टी टॅंकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार मारले. घटनेचे गांभीर्य ओळखून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंडारे याचा कोयत्याने; तर सचिन याला वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून निर्घृणपणे तिहेरी हत्याकांड घडविले होते. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये या खटल्याचे कामकाज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले होते.
|