नाशिकहून चार वर्षांत २,७०२ महिला बेपत्ता

नाशिकहून चार वर्षांत २,७०२ महिला बेपत्ता

माहिती अधिकारात उघड, जिल्ह्यातील ३३४ मुलींचा पत्ता लागेना

नाशिक - जिल्ह्यातून चार वर्षांत दोन हजार ७०२ महिला बेपत्ता झाल्या. यामध्ये ३३४ अल्पवयीन मुली आहेत. यातील बहुतांश जणींचा पोलिसांनाही शोध लागलेला नाही. ही धक्कादायक बाब पोलिसांकडूनच उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते महेंद्र मिसर यांच्या पाठपुराव्यात हे स्पष्ट झाले. 

नाशिक शहरात पंचवटी, आडगाव, उपनगर, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, सातपूर, अंबड, भद्रकाली, गंगापूर रोड ही पोलिस ठाणे आहेत. जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यांत २०१४-२०१७ या कालावधीत हरविल्याच्या दाखल झालेल्या तक्रारींची माहिती संकलित करण्यात आली. अनेक हरविलेल्यांच्या तक्रारी दाखलच झालेल्या नाहीत. यामध्ये शहरात दोन हजार ६६८, जिल्ह्यात दोन हजार ७७ जण बेपत्ता झाले. यामध्ये शहरातील एक हजार ३५१ महिला व १३५ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यांत एक हजार १७ महिला व १९९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. माहिती अधिकारात दीर्घकाळ पाठपुरावा केल्यावर ही माहिती मिसर यांनी मिळवली. त्याचा संबंध थेट कौटुंबिक व सामाजिक आहे. त्यामुळे ही व्यवस्था टिकविण्यासाठी ‘संघर्ष नको संवाद हवा. कुटुंब जपूया’ हा उपक्रम ते राबवत आहेत. महिलांवरील अत्याचार, फसवणूक, सायबर गुन्हे यांच्याशी संबंधित आहेत. सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्‍टर, शासकीय कर्मचारी या सगळ्यांच्या सहभागातून त्यावर प्रबोधन केले जाणार आहे.    

पालक-मुलांतील तुटत चाललेला संवाद, कौटुंबिक ताणतणाव, पती-पत्नीतील विसंवाद, सोशल मीडियाचे भ्रामक जाळे अशा विविध कारणांनी समाजात टोकाची स्थिती निर्माण होत आहे. त्याचा सर्वाधिक दुष्पपरिणाम महिला व कुटुंब व्यवस्थेवर होत आहे. या तक्रारदारांशी झालेल्या संवादातून ही कारणे पुढे आली आहेत. अल्पवयीन मुले-मुली किरकोळ कारणातून घरे सोडतात. त्यानंतर त्यांची अनेकदा बिकट अवस्था होते. 

महिला, अल्पवयीन मुली अनेकदा प्रलोभनांना बळी पडतात. त्यात त्याची फसवणूक होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे हा गंभीर सामाजिक विषय म्हणून पुढे येत आहे. तक्रार दाखल झाल्यावर महिला, नागरिक, अल्पवयीन मुले, मुलींचे छायाचित्र पोलिस आपल्या संकेतस्थळ तसेच पोलिस ठाण्यांना वितरित करतात. प्रारंभी केवळ नोंद होते. नागरिकांना परिसरात तसेच परिचितांकडे शोध घेण्यास सांगितले. शोध अयशस्वी झाल्यावरच पोलिसांत नोंद होते. त्यामुळे जी संख्या पोलिसांकडून उपलब्ध झाली त्यात वाढ होऊ शकते. 

एक गंभीर सामाजिक प्रश्‍न म्हणून त्यावर उपाययोजनेची आवश्‍यकता आहे.

सायबर क्राइमची मदत
हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अत्यंत क्‍लिष्ट प्रक्रिया असते. त्यासाठी हरविलेल्या व्यक्तीचे मित्र, कुटुंबीय, परिचितांकडे दीर्घकाळ माहिती घ्यावी लागते. त्याचा उपयोग होतोच असे नाही. मात्र, सध्या प्रत्येक शहरात सायबर क्राइम ठाणे उघडण्यात आले आहे. त्यातून मोबाईल संच व सिमकार्ड याद्वारे शोध सोपा झाला आहे. मात्र, युवकदेखील यामध्ये तरबेज झाले आहेत. अनेकदा हरविलेल्या व्यक्ती मोबाईलचा वापर बंद करतात. नव्या सिमकार्डचा वापर करतात. त्यात सायबर क्राइम शाखा महत्त्वाची भूमिका बजावते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com