नाशिक - मातंग समाजाच्या विकासासाठी आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही दलितांच्या आरक्षणात "अ', "ब', "क', "ड' प्रवर्ग लागू केला पाहिजे, तरच त्यांनाही प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील, असे स्पष्ट मत राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
प्रा. ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्टपासून वाटेगाव ते चिरागनगर अशी संवादयात्रा निघाली आहे. यात पुढील 28 दिवसांत 180 सभा घेतल्या जाणार आहेत. संवादयात्रेचे आज शहरात आगमन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ढोबळे म्हणाले, राज्यात एक कोटी 30 लाख दलित समाज आहे. त्यात 65 लाख बौद्ध, 28 लाख मातंग, 14 लाख चर्मकार व उर्वरित मेहतर मेघवाळ, वाल्मीकी, मोची, कोल्हार समाज आहे. मातंग समाज आजही परंपरागत व्यवसायात अडकलेला आहे. शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होऊनही या समाजाला त्याचा लाभ घेता आला नाही. व्यसनाधीनता, अज्ञानामुळे समाज मागेच राहिला आहे. त्यांना आंध्र प्रदेशप्रमाणे प्रवर्ग पाडून संधी उपलब्ध झाल्यास प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मागासवर्गीय महामंडळाचे कर्जही माफ होणे गरजेचे आहे.
|