तब्बल चार हजार प्रवेश निश्‍चित;आज प्रवेशाची अखेरची संधी

तब्बल चार हजार प्रवेश निश्‍चित;आज प्रवेशाची अखेरची संधी

नाशिक - अकरावी प्रवेशाच्या तिन्ही शाखांची कट ऑफ लिस्ट जाहीर होताच आज पहिल्या दिवशी चार हजार ३६२ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्‍चित केला. पहिल्याच यादीत पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्यांना उद्या (ता. १३) प्रवेश निश्‍चित करण्याची अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे आज दहा हजार ५८७ पैकी किती विद्यार्थी प्रवेश निश्‍चित करतात, हे पाहावे लागणार आहे. 

प्रवेश निश्‍चित करण्यासाठी आज विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांत गर्दी केल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागले. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी पहिल्या यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय निवडलेल्या एकूण १४ हजार ९६५ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्यात आज कला (६७१), वाणिज्य (१५१०), विज्ञान (२०७२) आणि किमान कौशल्य (१०९) मिळून चार हजार ३६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केला. आज पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या दहा हजार ५८७ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्याची अखेरची संधी असून, त्यानंतर त्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात येईल. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. 

दोन दिवसांत किती प्रवेश निश्‍चित होतील, त्यानंतर १४ जुलैला रिक्त जागांचा आढावा घेऊन १५ जुलै २०१७ पासून दुसऱ्या यादीसाठी अर्ज न केलेल्यांना अर्ज करून प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसेच, अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम बदलण्याची संधीही पुन्हा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना 
प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो रद्द करता येईल. तसेच, त्याला दुसरी शाखा किंवा माध्यमासाठी नव्याने अर्ज करून प्रवेश मिळू शकतो. आतापर्यंत ऑनलाइन अर्ज न केलेल्यांना अर्ज मिळविता येऊ शकतो. दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय विद्यार्थ्यांना मिळाल्यास त्याने त्यासाठी प्रवेश निश्‍चित न केल्यास त्यास पुन्हा प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊन पसंतीच्या महाविद्यालयासाठी प्रयत्न करता येईल. परंतु, ते न मिळाल्यास पहिल्यांदा मिळालेल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. 

‘एटीकेटी’साठी विशेष फेऱ्या
‘एटीकेटी’च्या प्रवेशासाठी जुलै २०१७ च्या निकालानंतर विशेष फेऱ्या होऊन विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्‍चित करता येईल. कला, क्रीडामार्फत अर्ज भरून झाल्यानंतर वाढून आल्यास अर्जात बदल करण्यासाठी बोर्डाकडून विहित नमुन्याचे पत्र उपसंचालक कार्यालयात देणे बंधनकारक असेल. त्यानंतर बदल होईल. 
ज्या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांनी आज आपले प्रवेश निश्‍चित करणे बंधनकारक असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित करावा.
- रामचंद्र जाधव,  शिक्षण उपसंचालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com