उत्तर महाराष्ट्र बोंडअळीच्या विळख्यात

उत्तर महाराष्ट्र बोंडअळीच्या विळख्यात

नाशिक - विदर्भातील कपाशीवर थैमान घातलेल्या बोंडअळीने उत्तर महाराष्ट्रही आपल्या कवेत घेतल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील ४.७६ लाख हेक्‍टरपैकी सुमारे ३.८६ लाख हेक्‍टर (८१ टक्के) क्षेत्र या किडीने बाधित झाले आहे. तीच स्थिती धुळे जिल्ह्यात असून, तेथील २.०५ लाख हेक्‍टरपैकी सर्व १०० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले.

नंदुरबार जिल्ह्यातील १.०२ लाख हेक्‍टर कपाशीपैकी ०.३६ लाख हेक्‍टरला बोंडअळीने दणका दिला. त्यापाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील ०.४६ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी ०.१८ लाख (३९ टक्के) क्षेत्रावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ३९ टक्के पिकावर बोंडअळीने उच्छाद मांडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

भरपाईबाबत टोलवाटोलवी
विधानसभेत आज झालेल्या गरमागरम चर्चेनंतर प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले, तरी नुकसानभरपाईबाबत पुन्हा अटी- शर्तीचा गोंधळ कायम आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे अजून पंचनामे झालेले नाहीत. शासनाने आज पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यानंतर पंचनामे होतील. पंचनामे झाल्यानंतर मदतीबाबत पुन्हा गोंधळच आहे.

पीकविमा उतरविला आहे असे, विमा नाही असे, याशिवाय आपत्कालीन स्थितीच्या मदतीच्या आदेशात बसणाऱ्या अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या एकाच प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मात्र भिन्न भिन्न स्वरूपात मिळण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत शासनही सतर्क आहे. म्हणून तिन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती घेत त्यानंतर मदत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बोंडअळीच्या नुकसानीबाबत मदत मिळण्यात दिरंगाईची शक्‍यता आहे. 

मर रोगाचा प्रभाव
इगतपुरीत सोनोशी गावात हरभरा पिकावर मर रोगाचा, तर तुरीच्या पिकावर तीन गावांत शेंगमाशी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. इगतपुरी तालुक्‍यात मर व शेंगमाशी रोंगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत चार गावांत प्रादुर्भाव दिसून आला आहे. तूर पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावाने गावच्या गावे बाधित झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. 

रब्बीच्या ६३ टक्के पेरण्या
तुलनेने जिल्ह्यात रब्बीची स्थिती मात्र चांगली आहे. विभागात रब्बीचे क्षेत्र कमी आहे. ४.०३ लाख हेक्‍टर रब्बीच्या क्षेत्रापैकी मंगळवारपर्यंत २.५३ लाख हेक्‍टर क्षेत्रावर (६३ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. रब्बी पिकांची स्थिती चांगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com