नाशिक - नगर जिल्ह्यातील पांगरमल येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान विषारी दारू प्यायल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात आज सरकारतर्फे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात 20 आरोपी असून, 19 जणांना अटक करण्यात आली असून, अन्य फरारी आहेत. हा खटला येथील न्यायालयात वर्ग करण्यात आला असून, आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.
न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या न्यायालयात आज या खटल्यातील 2 हजार 850 पानी दोषारोपपत्र जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सादर केले. त्यात 450 साक्षिदारांचा समावेश आहे. यातील 10 आरोपींना 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. नगर जिल्ह्यातील पांगरमल येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान 19 फेब्रुवारीला विषारी दारू प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता, आरोपींमध्ये जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे.
|