नाशिक - शेतकरी संपावर गेल्यापासून शहरात येणारे दूध व जनावरांचा चारा बंद झाला आहे. त्यामुळे दुधाचे तर भाव वधारले आहेतच, जनावरांचा चाराही दुप्पट भावाने खरेदी करावा लगत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात संगमनेर, जळगाव, चाळीसगाव व गुजरातमधून येणारे प्रक्रियायुक्त दूध बंद झाले आहे. जे थोडेफार येते तेही चोरून लपून आणावे लागत आहे.
दूधगाड्या, टॅंकरच्या ऐवजी आता इतर प्रवासी वाहनांचा वापर करून दूध आणून विकावे लागत आहे. कधी फक्त म्हशीचेच दूध येते. कधी फक्त गायीचेच येते. काही डेअऱ्यांचे फक्त ताकच पोचते. काही करून ग्राहकांची थोडी का होईना गरज ते भागवत आहेत; मात्र हॉटेल्स, चहाच्या टपऱ्यांना लागणारे दूध पुरेसे नाही. त्यातच चढ्या भावाने दूध विकत घेऊन चहा विकणे अशक्य असल्याने बऱ्याच चहा विक्रेत्यांनी सध्या टपऱ्या बंद ठेवणेच पसंत केले आहे.
मध्यमवर्गीयापर्यंत दूध पोचत असले, तरी गरिबांना मात्र दुधासाठी भटकावे लागत आहे. शहरातील तबेलेचालकांना ताजा चारा आवश्यक असतो. संपापूर्वी तो अडीच हजार रुपये टन होता. आता मात्र साडेपाच हजार रुपये टनाने विकत घ्यावा लागत आहे. त्यातही तो रात्री-पहाटे कोणाला दिसणार नाही, असा आणावा लागत आहे. दूध विकताना आंदोलक ते फेकून तर देणार नाही ना, याची धास्ती त्यांना आहे.
|