नाशिक - "अनुलोम' हा शब्द समाजजीवनाच्या आरोग्याशी निगडित आहे. कोणतीही योजना चांगलीच असते; फक्त तिची योग्य पद्धतीने अंमलबजावणी महत्त्वाची असते. घटनेने चांगली कामे करण्याची जबाबदारी शासनावर व अधिकाऱ्यांकडे दिली आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्थांनी समाजोपयोगी व लक्षवेधी कामे उभारावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी (ता. 21) अनुलोम विकास मेळाव्यात केले.
रावसाहेब थोरात सभागृहातील या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून झगडे बोलत होते. मेळाव्यास उत्तर महाराष्ट्रातील 1,160 संस्थांचे अडीच हजार प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय, अनुलोम उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख अमित दमाळे आदी उपस्थित होते.
या वेळी भारतीय यांनी लोकसेवेच्या या मांदियाळीचे कौतुक करताना स्वयंसेवी संस्थांना चांगल्या कार्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. दमाळे यांनी अनुलोमच्या गेल्या दोन वर्षांतील कार्यावर प्रकाश टाकला.
|