कांद्याची आयात अन्‌ निर्यातबंदीही नको - खोत

कांद्याची आयात अन्‌ निर्यातबंदीही नको - खोत

नाशिक - कांद्याला गेल्या दोन वर्षांमध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाला. आता मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कांद्याची आयात करण्यात येऊ नये. तसेच निर्यातबंदीप्रमाणे निर्यातमूल्य दर लागू करू नये आणि कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लागू करू नये, अशी विनंती राज्याचे कृषी-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी केली आहे. नाशिकमधून त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनाही खोत यांनी याच आशयाचे पत्र लिहिले आहे. कांदा लिलावाची सुरवात करण्यासाठी खोत नाशिकच्या दौऱ्यावर होते. ‘सकाळ’शी बोलताना खोत म्हणाले, की महाराष्ट्र कांद्याचे  आगार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कांद्याच्या भावामध्ये वाढ होऊ लागली आहे. याच परिस्थितीचा आढावा मी नाशिकच्या दौऱ्यात घेतला. शेतकरी, व्यापारी आणि बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या वेळी प्रत्येक घटकाने गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला न मिळालेल्या भावाचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला एक हजार ८०० ते २ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असलेला ९० टक्‍क्‍यांहून अधिक कांदा शेतकऱ्यांचा आहे. तसेच क्विंटलभर कांद्याचा उत्पादन खर्च एक हजार ७०० रुपयांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. कांद्याच्या साठवणुकीसाठी २००८-०९ पासून गेल्या वर्षापर्यंत १९ हजार १५० कांद्याच्या चाळींची उभारणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात तीन लाख ९१ हजार ८१४ मेट्रिक टन कांद्याची साठवणूक होत  आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com