तीन तलाकवर सत्र, मग शेतकऱ्यांसाठी का नको? - संजय राऊत

तीन तलाकवर सत्र, मग शेतकऱ्यांसाठी का नको? - संजय राऊत

नाशिक - शेतकरी आत्महत्येचा सर्वांत मोठा फटका महाराष्ट्राला बसतो आहे. शेतकरी नष्ट होत चालला असताना शेतकऱ्यांच्या हक्‍कांसाठी कायदा करायला हवा. कृषी खात्याचा वेगळा अर्थसंकल्प असावा.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विशेष सत्र घेण्याची पी. साईनाथ यांची मागणी रास्त आहे. जर तीन तलाकच्या विषयावर विशेष सत्र बोलावले जाऊ शकते, तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विशेष सत्र का घेतले जाऊ नये, असा प्रश्‍न उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू नाशिक झाला आहे. विषय स्थानिक असो की राज्याचे, चांगलेच रंगत आहे. उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवर सत्तेवर येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. मिसळ पार्टीचे संयोजन चांगली बाब आहे. आपणही शनिवारी (ता. १३) होत असलेल्या मिसळ पार्टीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

उमरला कोणी बोलावले
पुण्यात एल्गार परिषदेत खालिद उमरला कोणी बोलावले, याचा शोध घेतला जावा. देशाचे तुकडे व्हावे, अशी इच्छा ठेवणाऱ्यांना शनिवारवाड्यावर वातावरण गढूळ करण्यासाठी बोलावले. त्यामुळे केवळ हिंदुत्ववाद्यांवर आरोप करून चालणार नाही, तर खऱ्या दोषींवर कारवाई व्हावी. ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळ्यात संशयित इटलीतील कंपनीला तेथील न्यायालयाने निर्दोष ठरविले. या निर्णयाचा भारतात सुरू असलेल्या खटल्यावर परिणाम होईल. पुरावे नसताना आरोप होत असतील, तर जनता सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास ठेवणार नाही, याची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले. 

बापट अस्सल पुणेकर; जे म्हटले ते खरंच!
‘हे सरकारचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे आताच काय ते पदरात पाडून घ्या,’ अशा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या वक्‍तव्याविषयी त्यांना विचारले असता, श्री. राऊत म्हणाले, की बापट ज्येष्ठ मंत्री आहेत व अस्सल पुणेकरही आहेत. त्यांच्या पोटात असलेले ओठावर आले असून, त्यांच्या मताशी सहमत आहे. ते जे बोलले असतील ते खरंच आहे, असे त्यांनी सांगितले. 

शेवटच्या दिवसापर्यंत सत्ता भोगेल
मध्यावधी निवडणुकांविषयी प्रश्‍न विचारला असता, खा. राऊत म्हणाले, की यापूर्वी सहा महिने अगोदर सत्ता सोडण्याची चूक झाली आहे. आजच्या काळात तरी कालावधी पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी कुठलाही पक्ष सत्ता सोडेल, असे मला वाटत नाही. अखेरच्या दिवसापर्यंत सरकार कायम राहील, असे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com