नाशिक - भगूर येथील जगदीश बहिरू शिरसाठ (वय 37, रा. जैनवाडा, भगूर) या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज सकाळी भगूर ते देवळाली कॅम्पदरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली. शिरसाठ यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये कर्जामुळेच आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
शिरसाठ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, की पीककर्ज माफ झाले असले, तरी प्रोत्साहन अनुदान मिळत असते. आपल्या शेतीवर 95 हजार रुपयांचे कर्ज असून, या व्यतिरिक्त मर्चंट बॅंकेचे 30 हजार रुपये व उसनवार घेतलेले 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. प्रोत्साहन कर्ज केवळ 18 हजार 492 रुपये मिळाले. शनिवारी बॅंकेत गेलो असता, पुढच्या आठवड्यापासून एक हजार रुपये आठवड्याला मिळतील, असे सांगण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत असल्याने आत्महत्या करीत आहे. पत्नी सुरेखाला न्याय मिळावा, असेही चिठ्ठीत शेवटी म्हटले आहे.
|