शाळांच्या सुट्टीत निवडणूक लागल्याने उमेदवारांच्या डोक्याला झाला ताप!

Election
Election

येवला : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी निवडणूक जाहीर होऊन शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.तर आठ जून रोजी या निवडणुकीचे मतदान पाच जिल्ह्यात होणार आहे.मात्र २ मे पासून सर्वच शाळांना सुट्ट्या लागलेल्या असून १५ जूनपर्यंत या सुट्या असणार आहे. त्यामुळे सुट्ट्यात निवडणूक आल्याने उमेदवारांच्या डोक्याला ताप होऊन शिक्षक असलेले मतदार शोधण्यासाठी मोठी कसरत होणार आहे.

नाशिक,धुळे,जळगांव, नंदुरबार व नगर या पाच जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचा हा मतदार संघ असून या वर्षी सुमारे ५० हजार मतदार आहेत.त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे उमेदवारांना अवघड झाले आहे.काही उमेदवारांनी शाळांकडून शिक्षकाची माहिती मिळवुन वैक्तिक पत्रव्यवहार तर काहींनी मोबाइलवर प्रचार चालवला आहे.

मागील महिन्यांपासून सुरु असलेला प्रचार विचारात घेता टीडीएफचे प्रा.संदीप बेडसे व भाजपाचे अनिकेत पाटिल तसेच माजी खासदार प्रतापदादा सोनवने यांच्यासह टीडीएफचे भाऊसाहेब कचरेपाटिल,आप्पासाहेब शिंदे,राजेंद्र लांडे, शालीग्राम भिरुड यांनीही प्रचारासाठी जोर लावला असून शिक्षक परिषदेने सुनील पंडित यांना उमेदवारी दिली आहे.या निवडणुकिसाठी पसंती क्रम असणार असून निवडणुक जाहीर झाल्याने प्रचाराची रंगत वाढली आहे.

खरे तर ही निवडणूक शिक्षक संघटना व संस्थाचालकांचा विचारांवर अधिक प्रमाणात अवलंबून असते. असे असले तरी शिक्षक असलेल्या मतदारांना भेटणे ही तितकेच महत्त्वाचे असते अन्यथा एखाद्याचा स्वाभिमान दुखावला तर मत गमावण्याची भीती असते. त्यामुळे मागील एक दीड महिन्यात सर्वच इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक शाळेवर जाऊन शिक्षकांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र तेव्हा निवडणूक जाहीर नव्हती पण आता निवडणूक जाहीर झाल्याने प्रत्यक्ष प्रचार करते वेळी उमेदवारांना शिक्षकांची भेट घेणे गरजेचे झाले आहे. पण शिक्षक शाळेवर नसल्याने त्यांना भेटणार कुठे,कसे असा प्रश्न उमेदवारांना व त्यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या त्यांच्या शिक्षक नेत्यांना पडला आहे.

घर नको आता मोबाईलच बरा...
आत्तापर्यंत सर्वच शिक्षक मतदार उमेदवारांना शाळेतच भेटलेले आहेत. त्यामुळे कोणता शिक्षक कोणता गल्लीबोळात रहातो याची माहिती मिळण्याचा यापूर्वी प्रश्नच आला नव्हता आता ऐनवेळी एवढ्या सगळ्या शिक्षकांचे घरे शोधणार कसे आणि शिक्षक सुट्ट्यांमुळे घरी भेटतीलच का ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शिक्षक तर फिरण्यासाठी तसेच सुट्ट्यांमुळे आपापल्या गावी गेले असल्याने देखील भेटी घेणे कठीण झाल्याने आता मोबाइलवर संपर्क साधणे हाच एकमेव पर्याय उमेदवारांपुढे रराहिला आहे.शिक्षकांच्या एकत्रित बैठका घेणे,शाळा कॉलेजला जाऊन त्यांना भेटणे व इतर सर्व गोष्टी एकत्रितपणे करणे आता अवघड होणार आहे हे नक्की!

“इच्छुकांनी आतापर्यंत एक दोन वेळेस शाळेमध्ये येऊन सर्वांशी चर्चा केली आहे.मात्र निवडणुकीचा प्रचार करताना सुट्ट्यांमुळे उमेदवारांना शिक्षकांची शोधाशोध करावी लागणार हे नक्की आहे.सर्वच मतदारांना भेटणे गरजेचे असते पण सुट्ट्यांमुळे उमेदवारांची अधिक धावपळ होऊ शकते.
-विजय आरणे,शिक्षक नेते,येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com