नाशिक - शहरातील स्वच्छतेची शाळांकडून अपेक्षा नाही. मात्र शहरात कचरा होऊ नये म्हणून जागरूक नागरिक शाळांमधून घडावेत, अशी अपेक्षा आहे. तसेच कृतियुक्त शिक्षण ही काळाची गरज असून स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी महापालिका व खासगी शाळांमध्ये "स्वच्छता दूत' उपक्रम राबविण्यात येईल. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही घोषणा शुक्रवारी केली.
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराचे स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेल्या नूतनीकरणानंतर पहिल्यांदाच आयुक्तांनी खासगी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांची बैठक घेतली. स्वच्छता दूत उपक्रमांतर्गत सर्व शाळांना शालेय आवारात, प्रत्येक मजल्यावर हिरवे, निळे व लाल रंगाची कचरा पेटी (डस्टबिन) ठेवावी लागेल. कृतियुक्त शिक्षणानुसार विद्यार्थ्यांना वर्गवारीनुसार कुठल्या रंगाच्या पेटीत कचरा टाकायचा याचे कृतिशील शिक्षण शिक्षकांनी द्यायचे आहे. उपक्रम राबविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांची असेल. विद्यार्थ्यांमधून प्रतिनिधी अर्थात "कॅप्टन'ची निवड केली जाईल. शाळांकडून विविध संकल्पनांवर आधारित उपक्रम राबवावेत.
|