
Nashik News: महामार्गावरील CCTVचा नाशिककरांना फायदा! कसारा ते नाशिक मार्गावर कॅमेरे बसविण्याची मागणी
Nashik News : कसारा घाट ते कल्याण फाटा यादरम्यान पोलिसांकडून महामार्गावर ४४ कॅमेरे बसविले जाणार आहे. याचा लाभ महामार्गावर सर्वाधिक प्रवास करणाऱ्या नाशिककरांच्या पदरात पडणार आहे.
वाढत्या गुन्हेगारीला देखील आळा बसण्यास या निमित्ताने मदत होणार आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी देखील महापालिकेच्या हद्दीपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून महामार्गावरील प्रवास अधिक सुखकर करावा अशी मागणी होत आहे. (CCTV on highway benefits Nashik poepleDemand for installation of cameras on Kasara to Nashik route Nashik News)
नाशिक ते कल्याण फाटा या १४० किलो मीटरच्या प्रवासात ८० किलोमीटरचा भाग कसारा ते कल्याण फाटा तर नाशिक शहरातील द्वारका ते कसारा घाट हा ६० किलोमीटरचा महामार्ग परिसर येतो. यातील कसारा घाट ते कल्याण फाटा या महामार्गावरील ८० किलोमीटरच्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी २२ ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिवसा पाचशे मीटर पर्यंतची क्षेत्र तर रात्री दीडशे मीटर क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या टप्प्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघात, अवैध वाहतूक व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे महामार्गावर लावले जाणार आहे. याचा पोलिसांना तपास कार्यात मोठा लाभ होणार आहे. तसेच गुन्हेगारीवर देखील नियंत्रण मिळविता येणार आहे. कसारा जवळील खर्डी येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नाशिकच्या गुन्हेगारीवर नियंत्रण
नाशिक मध्ये गुन्हेगारी कृत्य करून मुंबईकडे पसार होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. नाशिक व ठाण्याच्या परिसरातील ग्रामीण भागात अनेक गुन्हेगार तसेच तडीपार झालेले गुंड वास्तव्याला आहे.
या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनेकदा छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्ये होतात. विशेषतः महामार्गावरील ढाबे हे गुन्हेगारीचे प्रमुख केंद्रे आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
नाशिक ते कसारा यादरम्यान देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
"ठाणे ग्रामीण पोलिसांनी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याप्रमाणे नाशिक ते कसारा दरम्यान देखील पोलिसांनी किंवा महामार्ग प्राधिकरणाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महामार्गावरील अडथळे दूर करून महामार्ग विस्तारीकरणाला शासनाने प्राधान्य देणे आवश्यक आहे."- अभय कुलकर्णी, अध्यक्ष, नाशिक फर्स्ट, नाशिक.