अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. म्हणून महाराज वंदनीय आहेत. शिवचरित्राने प्रत्येकाच्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो असे प्रतिपादन प्रख्यात किर्तनकार तथा शिवचरित्रकार गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे मनोहर महाराज सायखेडे यांनी केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे शिवजयंतीनिमित्त संगीतमय शिवचरित्र कथा सोहळा सुरू आहे. यानिमित्ताने शिवचरित्र कथे प्रसंगी व्यासपीठावरुन ते बोलत होते.
चार दिवसीय संगीतमय कथेमध्ये शिवाजी महाराजांचा पुर्व इतिहास, स्वराज्याची मार्गक्रमणे, शिवरायांची शौर्यगाथा, तसेच शिवराज्यभिषेक आदी. विषयांवर या संगीतमय कथेतुन प्रबोधन होणार आहे. त्याचप्रमाणे इतिहासकालीन जिवंत चलचित्र देखाव्यांची प्रतिभूतीही भाविकांनी या कथेतुन पहावयास मिळ आहेत. मनोहर महाराज सायखेडे यांनी आपल्या निरुपणात सांगितले की, शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात आहे. त्यांनी जातिभेद केला नाही, तसेच स्त्री-पुरुष असा भेदभावदेखील केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे कार्य त्यांनी केले. शिवाजीराजे उपेक्षित, गोरगरीब वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते. समाजात मजूर, कष्टकरी, शेतकरी, श्रमकरी आणि विशेषतः सर्व जातिधर्मांतील महिला कायमच उपेक्षित असतात, त्यांच्याबाबत शिवाजी महाराज सहृदयी होते.
शिवचरित्रकथा १८ फेब्रुवारी पर्यंत दररोज रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत सुरू असून १९ फेब्रुवारीला बेलगाव कुऱ्हे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर नांदूरवैद्य येथील सामाजिक कार्यकर्ते मोईन शेख यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. शिवचरित्रकथेप्रसंगी जिवंत देखावे सादर करण्यात येत असून योगेश महाराज सायखेडे, दिनेश मोजाड, कैलास म्हसणे, पवन भागडे, सागर पोटे, प्रभाकर राक्षे यांच्याकडून कार्यक्रमाला साथसंगत लाभत आहे.
कार्यक्रमात श्रोत्यांना प्रश्न
कार्यक्रमाचा परिसरातील नागरिक लाभ घेत असून शासन निर्देशानुसार होणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढीला लागला आहे. ह्या कार्यक्रमासाठी बेलगाव कुऱ्हे येथील युवक, युवती, महिला, आणि सर्व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांना तीन महत्वाचे प्रश्न विचारून जलद उत्तर देणाऱ्या ३ विजेत्यांना बक्षीस दिले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.