
Flower Farming : कांद्याने रडवले पण ‘शेवंती’ ने सावरले..! गौरव वाघ यांचा फुलशेतीचा यशस्वी प्रयोग
Nashik News : कळवण तालुक्याचा पश्चिमपट्टा हा नेहमीच कांदे, टोमॅटो व मिरचीचे आगर समजले जाते. मात्र यंदाचे वर्ष हे शेतकऱ्यांच्या जिवाशी बेतणारे वर्ष ठरले. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, गहू, टोमॅटो, मिरची यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (cultivation of Shevanti in half an acre by young farmer Gaurav Wagh proved to be profitable nashik news)
सद्या या परिसरात कांद्याची स्थिती अत्यंत भयावह आहे. शेतकऱ्यांचा चाळीतील सडलेला कांदा फेकून देण्याची नामुष्की आली. बाजारपेठेतही कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने, कांदा, टोमॅटो रस्त्यावरच टाकून देण्याची वेळ आली.
अशा नकारात्मक परिस्थितीत कळमथे (ता.कळवण) येथील प्रयोगशील युवा शेतकरी गौरव वाघ यांनी अर्ध्या एकरात 'शेवंती' ची केलेली लागवड ही फायदेशीर ठरत असून हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा विचार न करता मोठया हिमतीने गौरव वाघ यांनी'शेवंती'फुलशेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले. पुणे येथून प्रत्येकी तीन रुपये दराने 'भाग्यश्री' या वाणाचे चार हजार शेवंतीची रोपे मागविली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अर्धा एकर क्षेत्रात मल्चिंग पेपर अंथरूण मिरची प्रमाणे लागवड केली. फक्त एक बेसल डोस, किरकोळ फवारणी व लागवडीसाठी मजूर असा सर्व खर्च मिळून चोवीस ते पंचवीस हजार रूपये खर्चात लागवड पूर्ण झाली.
सध्या लग्नसराई जोरात असल्याने 'शेवंती'ला चांगलीच मागणी आहे. विविध ठिकाणचे व्यापारी जागेवर येऊन त्याची शेवंती खरेदी करतात. शिवाय नाशिक, मुंबई, गुजरात येथील बाजारपेठेतही चांगला भाव मिळतो.
श्री.वाघ यांनी जागेवर ६० ते ८० रुपये किलोप्रमाणे शेवंतीच्या फुलांची विक्री केल्याने, फक्त चारच तोड्यात सर्व खर्च वसूल झाला .दर दहा दिवसांनी फुलांचा तोडा होत असतो. आठ किलोचे अर्ध्या एकरात सरासरी पंधरा कॅरेट प्रत्येक तोड्यात निघतात. साधारणपणे सहा महिने म्हणजे जेमतेम दिवाळी पर्यंत हे तोडे सतत सुरू राहतील.
सणसुद, साखरपुडा, लग्नात तसेच विविध उत्सव, समारंभात सजावटीसाठी भाग्यश्री 'शेवंती' ला चांगली मागणी आहे. एका बाजूला कांद्याने रडवले, तर दुसऱ्या बाजूला शेवंतीने वाघ यांना सावरले. गारपीट आणि अवकाळीच्या संकटात भाग्यश्री 'शेवंती' श्री. वाघ यांच्यासाठी एक आशेचा किरण ठरली आहे.
"'शेवंती' फुलशेतीचा अर्ध्या एकरात सहज म्हणून प्रयोग करून पाहिला. पाहिजे तसे लक्ष दिले नाही. तरीही हा प्रयोग यशस्वी झाला. फुलशेतीला मजूर कमी लागतात. शिवाय इतर पिकांच्या फवारणी व खतांपेक्षा खर्च कमी असतो. पारंपरिक पिकांपेक्षा वेगळा प्रयोग सर्वांनीच केला पाहिजे. एकच प्रकारचे पीक हे बाजारभावात अनिश्चित स्वरूपाचे ठरले आहे. पुढील वर्षांपासून फुलशेतीचे क्षेत्र मी वाढविणार आहे'." -गौरव वाघ, प्रयोगशील युवा शेतकरी, कळमथे