
Farmer Protest : ‘शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण...! शेतकऱ्यांचा रास्तारोको
Nashik News : शेतकऱ्यांचे मरण हेच या शासनाचे धोरण आहे. दीड महिना उलटूनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही मदत जाहीर झाली नसल्याने शनिवारी (ता.१९) डांगसौंदाणे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत बाजार समितीचे संचालक व शेतकरी नेते संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केळझर फाट्यावर टोमॅटो, कांदे रस्त्यावर ओतून रास्तारोको आंदोलन केले. (due to no help has been announced to hail affected farmers Roadblock protest nashik news)
गारपीटग्रस्त बागलाणला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन ही शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी आंदोलनात सरकार विरोधी घोषणाबाजी केली.
एप्रिल महिन्यात ९ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळीने या भागातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या भागातील प्रमुख पीक असलेले उन्हाळ कांदा संपूर्णपणे जमिनीतच सडला तर टोमॅटो, मिरची पीक भुईसपाट झाल्याने या भागातील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गत ७० वर्षात अशी गारपीट झाली नाही. या गारपीटीची दखल घेत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांनी तालुक्याच्या शेती बांधावर येऊन या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करत प्रस्ताव पाठवले. या संपूर्ण घटनेला आता एक महिना पूर्ण होऊन देखील शासनाने अद्याप पर्यंत शेतकऱ्याना कुठलीही आर्थिक मदत दिली नाही जाहीर ही केली नाही.
शासनाच्या या कारभारावर संतप्त होत सकाळी अकराला डांगसौंदाणेसह पंचक्रोशीतील निकवेल, चा. पाडे, दहिंदुले, भिलदर ,तळवाडे, साकोडे आदी गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात शेतकऱ्यांनी ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ असे म्हणत राज्य शासनाला जाब विचारण्याची वेळ आल्याचे बोलून दाखविले.
शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण असून शेतकरी राजा आता राजा राहिला नसून त्याला या राज्यकर्त्यांनी भिकारी केले आहे. आत्ताच्या शेतकरी नेत्यांचा बेगडीपणा असून शेतकरी नेते राजकारणी झाले आहेत. स्वर्गीय शरद जोशी सोडले तर या देशात शेतकऱ्यांची बाजू मांडणारा कोणीही नेता जन्माला आलेला नसल्याची खंत शेतकरी गोविंद चिंचोरे यांनी व्यक्त केली.
तर शेतमालाला कवडीमोल दर मिळत असताना राज्य सरकार आपले सरकार वाचविण्याच्या नादात शेतकरी वर्गाला विसरल्याच शेतकरी संजय सोनवणे यांनी सांगितले. एकीकडे शेतकरी जेसीबीने आपला कांदा उकिरड्यावर फेकत आहे तर दुसरीकडे स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून शेतीची नांगरटी करीत आहे.
मात्र या सरकारला याचे काही देणे घेणे नसल्याचे देखील संतप्त शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ बोरसे, गोविंदा सुलक्षण, आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी शेतकरी नेते संजय सोनवणे यांनी आक्रमक भूमिका मांडत सरकार कोणाचीही असो कुठल्याही पक्षाची असो आपल्याला त्याच्याशी घेणे देणे नाही मात्र शेतकरी हा मदतीपासून वंचित राहिला नाही पाहिजे. त्याला त्याच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे.
यासाठी लोकप्रतिनिधींना सुद्धा जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच, उपसरपंच सोसायटी सभापती,उपसभापती, परीसरातील ग्रामपंचायत सदस्य, संचालक,आदींसह बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.