सिन्नर (जि. नाशिक) : महाराष्ट्र राज्याच्या समृद्धीचा राजमार्ग म्हणून ओळख मिरवणारा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी मार्ग मात्र बरबादी करणारा ठरू पाहत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पिके जोमात उभी असताना समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या शेतांमध्ये महामार्गावरून वाहत येणारे पाणी साचत असल्याने या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांकडून याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या करूनही दुर्लक्ष होत असल्याने सिन्नर तालुक्यातील वावी येथील शेतकऱ्यांनी सहकुटुंब उपोषणास बसण्याचा इशारा दिल्यावर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून शेतांत पाणी जाणार नाही यासाठी चर खोदण्यात आले. (Due to rain Smriddhi highway water accumulates in fields damages crops nashik latest news)
भविष्यात समृद्धी महामार्गावरून पावसाचे पाणी शेतांमध्ये येऊ नये यासाठी प्रभावी उपाय योजना करावी अशी मागणी वावी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. आवर्षणाचा सामना करणाऱ्या या भागात यंदा खरीप हंगाम आशादायक होईल असे चित्र आहे.
मात्र समृद्धी महामार्ग लगत दोन्ही बाजूच्या शेतामध्ये महामार्गावरून वाहत येणारे पावसाचे पाणी साचून उभी पिके पाण्याखाली जात असल्याने व शेतात असणाऱ्या या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सिन्नर तालुक्यातील वावी येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी या संकटाचा सामना करत आहेत. मात्र, पॅकेज 12 अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुजोरी आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या संतापात भर घालणारे ठरू लागले आहे.
मंगळवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिलीप बिल्डकॉनच्या वावी येथील कॅम्पसमोर सहकुटुंब उपोषणास बसण्याची तयारी केल्यावर धास्तावलेल्या प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धी महामार्गावरून वाहत येणारे पावसाचे पाणी जाणार नाही यासाठी चर खोदून देत शेतकऱ्यांची मनधरणी करण्यात आली.
'सकाळ' मार्फत एमएसआरडीसीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात वावी येथील शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत व संभाव्य उपोषण आंदोलनाबाबत सुचित करण्यात आल्यावर समृद्धीच्या कामावर नियंत्रण करणाऱ्या नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांसह दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांचे कान टोचण्यात आले.
समृद्धीमुळे शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांना अडचणी निर्माण होणार नाही यासाठी योग्य उपाय योजना कराव्यात. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करावीत अशी सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने जेसीबी व यंत्रे पाठवून वावी येथील 'त्या' शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.