
Nashik News : महिन्याच्या खंडानंतर गोदावरी खळाळली! तरुणांची पोहण्यासाठी गर्दी
Nashik News : पिण्याच्या पाण्यासाठी गोदापात्रात पाटबंधारे खात्यातर्फे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे महिन्याच्या खंडानंतर गोदापात्र पुन्हा एकदा खळाळून वाहू लागले आहे.
वाहत्या पाण्यात मनसोक्त डुंबण्यासाठी रामतीर्थ, गांधी तलावासह अहिल्यादेवी होळकर पुलाच्या खालील बाजूस तरुणाईची मोठी गर्दी उसळत आहे. (Godavari river free flow after month break crowd of young people to swim Nashik News)
गत दोन दिवसांपासून नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात गोदावरी खळाळून वाहत आहे. तापमान चाळीशीकडे सरकू लागल्याने अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी गोदापात्रावर सकाळपासून सायंकाळनंतर मोठी गर्दी उसळत आहे.
सायंकाळी गांधी तलावाजवळील चौपाटीही फुलू लागली लागली असून त्याद्वारे येथील अर्थकारणासही काही प्रमाणात बूस्ट मिळाला आहे. १ मेपासून देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमाला सुरू आहे.
या वर्षी व्याख्यानासाठी राष्टीय, आंतरराष्ट्रीय वक्ते हजेरी लावत असल्याने श्रोत्यांची गर्दीही वाढली आहे. व्याख्यानासाठी आलेल्यांनाही क्षणभर पात्राजवळ बसण्याचा मोह आवरत नाही. व्याख्यान संपल्यावरही अनेक श्रोते या खळाळून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पानवेली आल्या वाहून
गोदापात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने अहिल्यादेवी होळकर पुलाच्या वरील बाजूस असलेल्या पानवेली मोठ्या प्रमाणावर खालील कुंडांमध्ये वाहून आल्या आहेत. यातील अनेक पानवेली रामतीर्थ परिसरात अडकून पडल्या होत्या.
त्यामुळे बुधवारी (ता.१०) रात्री उशिरापर्यंत या पानवेली हटविण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू होते. यातील काही पानवेली काढण्यात आल्या, मात्र त्यानंतरही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या या पानवेली गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर मंदिर व तपोवनात अडकून पडल्या आहेत.