
Rajya Natya Spardha : ‘गटार’ स्वच्छ ठेवणारे खरे देशभक्त!
नाशिक : सीमेवरील जवानांमुळे देश सुरक्षित आहे, त्याचप्रमाणे देशात गटार स्वच्छ करणारे कामगार असल्यामुळे देशातील नागरिक आरोग्यदायी जीवन जगू शकतात.
मात्र, हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन आजही कसे उपेक्षित आहे, हे ‘गटार’ या नाटकातून प्रेक्षकांना बघायला मिळाले. (haushi Rajya Natya Spardha finals true patriots who keep Gatar clean in drama nashik news)
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगळवारी (ता.२१) महाकवी कालिदास कलामंदिरात बहुजन रंगभूमी, नागपूर या संस्थेचे गटार हे नाटक सादर झाले. वीरेंद्र गणवीर लिखित या नाटकाचे दिग्दर्शक श्रेयश अतकर आहेत.
जाती आणि जातीशी बांधलेले व्यवसाय सोडण्याचे धाडस करणारी माणसेच जाती नष्ट करू शकतात. गटार या नाटकात क्रांतीचे आगमन चितारलेले आहे. गटार साफ करणाऱ्या माणसांचे ही गटारीकरण झालेले आहे. यात गटारीकरणाचा भूतकाळ तसेच वर्तमानकाळही या नाटकात आहे.
गटारीने गिळलेले बाबा-अम्माचे पूर्वज हा गटारीकरणाचा भूतकाळ आहे. आणि बाबा, अम्मा, गौतम, यादव हा या गटारी करण्याचा वर्तमान आहे. बाबा, गौतम, यादव यांचा शेवटही याच गटारीत म्हणजे या माणसांचे जगणे आणि मृत्यू गटारीनेच नियंत्रित केले आहे.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
गटारीत लपून बसलेल्या मृत्यूने या लोकांची जीवने संपविली आहे. या गटारीकरणाच्या भीषण रात्रीचा अस्त घडवणारी पहाट नाटकातच शेवटी झालेली आहे. या क्रांतिकारी पहाटेचे नाव रवी आहे. रवी शिकायला लागला. रवी स्वतंत्र विचार करायला लागला आहे. मात्र, वडिलांसह त्यांच्या सहकार्यांना गमावल्याचे चित्र दाखवताना स्वच्छता कर्मचारी हे सैनिकांसमान असल्याची भावना यातून प्रकट होते.
बुधवारचे नाटक रद्द झाल्याचे रसिक नाराज
राज्य नाट्य स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार बुधवार (ता. २२) दुपारी ‘फक्त एकदा वळून बघ’ हे नाटक सादर होणार होते. त्यानुसार प्रेक्षक चारला पोचल्यावर त्यांना नाटक रद्द झाल्याचे समजले. त्यामुळे प्रेक्षकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पाडव्याची शासकीय सुटी असल्याने प्रेक्षकांची गर्दी झालेली असताना अचानकपणे हे नाटक रद्द का झाले, याविषयी आयोजकांनाही माहिती कळवली नसल्याचे दिसून आले.