Nashik News: जलयुक्त शिवार योजनेत या 210 गावांत होणार सिंचन समृद्धीसाठी विविध कामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalyukta Shivar

Nashik News: जलयुक्त शिवार योजनेत या 210 गावांत होणार सिंचन समृद्धीसाठी विविध कामे

नाशिक : राज्य सरकारने जलयुक्त शिवार- दोन योजना जाहीर केली असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेच्या पूर्वतयारीला सुरवात झाली असून, नाशिक जिल्ह्यात यापूर्वी जलसंधारणची कामे झालेली वगळून पहिल्या वर्षी २१० गावांची निवड निश्चित केली आहे. तर नाशिक विभागात ८५० गावांची निवड केली आहे. (Irrigation works in 210 villages in nashik district under Jalyukta Shivar Yojana)

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाकांक्षी असलेली जलयुक्त शिवार योजना २०१५ ते २०१९ या कालावधी राबविली गेली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ही योजना गुंडाळली होती. शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या सरकारने जलयुक्त शिवाय अभियान-२ ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्यासाठी तयारी सुरू झाली असून, त्याचाच भाग म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्या जिल्ह्यांमधील गावांची निवड करण्याबाबतच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या संख्येप्रमाणे गावांची निवड करून राज्य सरकारकडे पाठविण्याच्याही सूचना केल्या आहेत.

नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांसाठी ८५० गावांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात २१०, नगरमधून २४०, जळगावमधून २४५, धुळ्यामधून ७० व नंदुरबार जिल्ह्यातून ८५ गावांची निवड करण्याच्या सूचना केल्या आहेत. नव्या योजनेतून जलसाक्षरतेला प्राधान्य दिले जाणार आहे.

या जलसाक्षरतेमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. याबाबत गावांची निवड करणे, आराखडे तयार करणे आदींबाबत यापूर्वीच जलसंधारण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला असून, त्याच आधारावर विभागीय आयुक्त गमे यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

जलयुक्ततून ही होणार कामे

गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजलपातळी वाढवणे, ही कामे केली जाणार आहेत. यासाठी भूजलपातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे.

नवीन योजनेनुसार प्रत्येक गावाचा जलआराखडा तयार करून त्यानुसार गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे, अपधाव रोखणे आदी कामे केली जाणार आहेत. तसेच पाणी साठविण्यासाठी शेततळे उभारणे, प्लॅस्टिक अस्तरीकरण करून पाणी साठवणे, सूक्ष्मसिंचन, मूलस्थानी जलसंधारण, सामूहिक पद्धतीने समन्याय तत्त्वाने सिंचन व्यवस्था करणे, पाणी साठविलेल्या प्रकल्पांवर पाणीवापर संस्थांप्रमाणे शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचन व्यवस्थापन करणे आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अशी होणार निवड

जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम) नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प व आदर्श गाव इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे पूर्ण झालेली गावे या योजनेतून वगळायची आहेत.

त्यानंतर उर्वरित गावांपैकी अवर्षण प्रवण तालुक्यातील गावे, भूजल सर्वेक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावे, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, अपूर्ण पाणलोट असलेल्या गावांची निवड प्राधान्यक्रमाने जलयुक्त योजनेसाठी केली जाणार आहे.

टॅग्स :NashikvillageIrrigation