
Farmers Protest : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादनाच्या अडचणी सोडविण्यासाठी शनिवारी (ता. १६) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.
कृती समितीने अध्यक्ष प्रकाश शिंदे, समितीचे दिंडोरीतील बाधित पंडित तिडके, राजाराम कांडेकर आदीनी बैठकीनंतर सोमवारच्या मोर्चाचा इशारा दिला. (March of Surat Chennai road affected farmers tomorrow nashik news)
जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाशिवाय केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी समजला जाणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर अशा सहा तालुक्यांतून जाणार आहे.
ग्रीनफिल्डसाठी जिल्ह्यातील ९९६ हेक्टर जमीन संपादित होईल. सध्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून, अपुरा मोबदला, रस्त्याच्या वहिवाटीच्या तांत्रिक अडचणी, प्रशासकीय उपेक्षा यामुळे शेतकरी विरोधात आहेत. प्रस्तावित सुरत-चेन्नई महामार्गासाठी जिल्ह्यातील ६०९ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी ९९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येईल. नाशिक जिल्ह्यात १२२ किलोमीटर अंतराचा हा महामार्ग असणार आहे.
सहा तालुक्यांतून जाणार मार्ग
महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे एक हजार ६०० किलोमीटरचे अंतर एक हजार २५० किलोमीटरने कमी होणार आहे; तर नाशिक-सुरत दरम्यानचे अंतर अवघे १७६ किलोमीटर कमी होणार आहे. नव्या महामार्गामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही शहरे जोडली जाणार आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असा आहे ग्रीनफिल्ड प्रकल्प
- दीड वर्षात जमीन अधिग्रहण
- अधिग्रहणानंतर तीन वर्षांत होणार महामार्ग
- ९९६ हेक्टर जमीन होणार अधिग्रहीत
- जिल्ह्यात दिंडोरीतील सर्वाधिक २३ गावे
"दिंडोरीत भूसंपादनामुळे द्राक्षबागेचे दोन तुकडे होणार आहेत. एका बाजूला शेततळे, दुसरीकडे शेताचा तुकडा, मधला भाग रस्त्यात जाणार आहे. मी रस्ता ओलांडून राहिलेल्या तुकड्याला पाणी देणार कसा, त्यासाठी रस्ता नाही. नीट मूल्यांकन होत नाही. भावही योग्य दिला जात नाही." - पंडित तिडके, बाधित शेतकरी, दिंडोरी
"जमिनींना कवडीमोल भाव दिला, ही क्रूर चेष्टाच आहे. मोजणीपूर्वी भाव सांगा, अशी मागणी होती. मात्र, थातूरमातूर कारणे सांगून मोजणी करून घेतल्यावर दर जाहीर झाले, तेव्हा पायाखालची वाळू सरकली. कवडीमोलाने जमीन देण्यास आमचा विरोध आहे." - राजाराम कांडेकर, बाधित, नाशिक