Nashik Kala Katta : चिन्मय उदगीरकर यांचा बहुआयामी प्रवास... | Nashik Kala Katta Chinmoy Udgirkar multifaceted journey nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinmay Udgrikar

Nashik Kala Katta : चिन्मय उदगीरकर यांचा बहुआयामी प्रवास...

"आधुनिक नवविज्ञान कितीही पुढारलेले असले तरीही स्वतःची स्वतःशीच ओळख करून देणारा सोपानमार्ग हा श्रद्धेपासूनच सुरू होत असतो. या श्रद्धेला दिशाच नसेल तर ती अंधश्रद्धा ठरते, मात्र योग्य वळण आणि नेमकी दिशा मिळाली तर हीच श्रद्धा अनुभूतीपर्यंतही नेऊन पोचविता येते. अर्थात, समाजात ही नेमकी दिशा देणाराही नेमका असा कोणीतरी लागतो. दिग्दर्शक त्याचे नाव, तो केवळ चित्रपटाचाच नसतो, तर समाजाचाही असतो. श्रद्धेच्या दिशेकडे आत्मावलोकनाच्या नजरेतून बघणारा प्रतिभावान अभिनेता, महाराष्ट्राचा सुपरस्टार, तरुण दिग्दर्शक चिन्मय उदगीरकर हा अशाच ‘द्रष्ट्या’ दिग्दर्शकांपैकी."- तृप्ती चावरे-तिजारे.

(Nashik Kala Katta Chinmoy Udgirkar multifaceted journey nashik news)

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नाशिकच्या मातीतून घडलेल्या या सव्यसाची अभिनेत्याने अल्पावधीतच मराठी मालिका आणि चित्रसृष्टी तर गाजवलीच पण त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेने एक वेगळा विचार समाजासमोर ठेवला.

सदाचार हा लोकप्रबोधनाचा विषय म्हणून कसा हाताळावा, याचा आदर्श माध्यमांसमोर प्रस्थापित केला. ‘सकाळ’ च्या वाचकांशी संवाद साधताना चिन्मय सर म्हणतात, अभिनय ही एक आध्यात्मिक कला आहे.

माझ्याच अभिनयाकडे मी साक्षीभावाने बघतो, तेव्हा माझ्यातला अंतस्थ ‘मी’ मला खऱ्या अर्थाने भेटतो. हा ‘मी’ आतून दरवेळी वेगळा असतो कारण, कालच्या पेक्षा आज तो अधिक समृद्ध झालेला असतो.

२०११ पासून स्वप्नांच्या पलीकडे या स्टार प्रवाहवरील मालिकेद्वारे लोकप्रिय झालेल्या चिन्मयच्या यशाची घोडदौड आज दिग्दर्शनाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचली आहे. याचे कारण म्हणजे बारा वर्षाहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात केलेली तपश्चर्या.

या काळात त्यांनी, नांदा सौख्यभरे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, घाडगे सून, सख्खे शेजारी, अग्गबाई सूनबाई, या मालिका, तसेच, श्यामचे वडील, वाजलंच पाहिजे, गुलाबजाम, प्रेमवारी, मेकअप, वाजवू या बँडबाजा या चित्रपटांतून स्वतःचे आणि प्रेक्षकांचेही अनुभवविश्व श्रीमंत केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सचोटीने केलेल्या या तपाचे फळ म्हणून शंकर महाराज या अवतारी संत व युगपुरुषाची सेवा त्यांच्या वाट्याला आली. शंकर महाराज या थोर अवलियाचे चरित्र, मालिका रूपाने चित्रित, दिग्दर्शित करणे आणि त्या निर्मितीचे आव्हान पेलणे ही सामान्य गोष्ट अजिबात नाही,

परंतु ‘श्री एम’ या आध्यात्मिक गुरूंच्या सहवासाने चिन्मयजींना ‘साक्षी भावाची’ (witness) बैठक काय असते, आणि त्या बैठकीवरून महाराजांकडे कसे बघावे हे समजले, आणि त्यांच्या दिग्दर्शनाला शंकर महाराज नावाचा तत्त्वाचा परिसस्पर्श झाला.

गुरू श्री. एम. यांच्याविषयी ते म्हणतात, त्यांच्या उपदेशातून, एक विलक्षण असे रूपांतर माझ्या अनुभवास आले. क्रियायोग हे त्या रूपांतरणाचे नाव. गीता हा केवळ एक धर्मग्रंथ नाही तर तिचे गायन हे प्रत्येक जिवाच्या धर्मक्षेत्रावर अखंड सुरूच असते.

हां, ते ऐकता मात्र आले पाहिजे आणि ते ऐकू यावे म्हणूनच गुरू असतो. आपल्याच जाणीवेतून ही ‘गीता’ ऐकू येते, कृष्ण ऐकू येतो आणि त्याची बासरीही ऐकू येते. शरीरातील पाठीच्या कण्याभोवती सुप्तावस्थेत दडलेली षट्चक्रे ही या बासरीची सहा छिद्रे..

या चक्रांची लय समजली की एका अद्भुत विश्वचैतन्याचा उदय होतो. 'स्वयम् भगवान' या भूमिकेतून मी ह्या विश्वचैतन्याचा उदय पाहिला आहे. विश्वाच्या रोमारोमात मी, आणि माझ्या रोमारोमात विश्वचैतन्य..'पिंडी तेच ब्रम्हांडी' हे जाणून माझ्याच जाणीवेवर स्थिर होण्याची एक विलक्षण अनुभूती.

या अनुभूतीत मी संयम राखला, सातत्य राखले, तिचा अर्थ जाणून घेतला. माझ्यातला 'मी पणा' नकळत गळून पडला. म्हणून तर अवधूत परंपरेतील कळस, संतश्रेष्ठ अवलिया शंकर महाराज यांच्या चरित्रातील रहस्य उलगडता आले.

अर्थात, यात माझे काहीच नाही. ही सारी शंकर महाराजांचीच लीला आहे. चिन्मयजींशी मारलेल्या गप्पांमधून एक नवा जीवन सुसंगत अध्यात्म दृष्टिकोन हाती लागत होता. त्यांच्या विचार ओघातून व्यक्त होणारी जीवनजिज्ञासा जाणून घेऊ या पुढील भागात ...